
नांदेड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।
वंदे मातरम या गीतास येत्या 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पुर्ण होत आहेत. ही एक आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्याअनुषंगाने शुक्रवार 7 नोव्हेंबर 2025 रोजी श्री गुरू ग्रंथसाहिबजी भवन तहसील कार्यालय जवळ नांदेड येथे वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 9.30 ते 10.45 या कालावधीत होईल. या कार्यक्रमासाठी मान्यवर व्यक्ती, विद्यार्थी, पालक व समाजातील विविध घटकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे.
वंदे मातरम गीताने भारतीयांना एकत्र आणण्यात आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिले असून, 1896 साली रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथमच ते गायले होते. वंदे मातरमने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अत्यंत प्रेरणादायी भूमिका निभावली. वंदे मातरम हे भारतमातेच्या ममतेचे प्रतीक आहे आणि ते ऐकताना प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत होते. राज्यातील शासकीय तालुका व जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis