कमी पाण्यातील पौष्टिक तृणधान्ये आरोग्य व शाश्‍वत शेतीसाठी उपयुक्त : कुलगुरू डॉ. इन्द्रमणि
कृषि विभागासाठी दोन दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण
कमी पाण्यातील पौष्टिक तृणधान्ये आरोग्य व शाश्‍वत शेतीसाठी उपयुक्त : कुलगुरू डॉ. इन्द्रमणि


परभणी, 22 डिसेंबर (हिं.स.)। सध्याच्या हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर कमी पाण्यात, कमी खतांवर तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असलेली बाजरी व ज्वारी ही पौष्टिक तृणधान्ये अत्यंत उपयुक्त आहेत. ही पिके शेतकर्‍यांनी आपल्या पीक पद्धतीत समाविष्ट करावीत तसेच दैनंदिन आहारात वापर केल्यास निरोगी आरोग्यास चालना मिळू शकते, असे मत कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय कृषि विकास योजना - महाराष्ट्र पौष्टिक गुणधर्म अभियान सन 2025-26 अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी दोन दिवसीय तृणधान्य चे महत्व लागवड व मुल्यवर्धन या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना कुलगुरूंनी, विद्यापीठाने बाजरी व ज्वारीचे अधिक लोह व जस्तयुक्त सुधारित वाण विकसित केले असून, हे वाण तसेच पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. हे कार्य कृषि सहाय्यक अधिकारी प्रभावीपणे करू शकतात, कारण त्यांचा शेतकरी बांधवांशी थेट संपर्क असतो. या पिकांखालील क्षेत्र विस्तारासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन मूल्यवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच बाजरी व ज्वारी पिकांमध्ये काढणी प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने संशोधन करून त्याचे निष्कर्ष शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. क्लस्टर पातळीवर प्रात्यक्षिकांचे आयोजन करून कमी खर्चिक निविष्ठांच्या वापरातून उत्पादनवाढ साधता येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. प्रकाश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात पोषक तृणधान्यांचे क्षेत्र व उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने कृषि विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. तांत्रिक सत्रांमध्ये डॉ. चंद्रकांत पाटील यांनी बाजरी लागवडीविषयी, कुलकर्णी यांनी पोषक तृणधान्यांचे मूल्यवर्धन, डॉ. योगेश बन यांनी नाचणी, वरी व भगर लागवड तंत्रज्ञान, तर डॉ. ज्ञानेश्‍वर मुटकुळे व डॉ. दिलीप हिंगोले यांनी किड व रोग व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सूर्यकांत पवार यांनी बियाणे उपलब्धता व जैविक खताच्या वापराविषयी माहिती दिली.

माजी ज्वारी पैदासकार डॉ. लक्ष्मण जावळे यांनी ज्वारी व हुरडा लागवडीद्वारे अधिक उत्पन्न कसे मिळविता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर नरसापूर व सारंगपूर येथे श्री. आनंद गंजेवार यांनी हुरडा उत्पादक शेतकर्‍यांच्या शेतांना भेट देऊन त्यांच्या अनुभवांबाबत व अडचणींबाबत माहिती घेतली तसेच योग्य मार्गदर्शन केले.शेतकर्‍यांपर्यंत विद्यापीठाच्या शिफारशीनुसार तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविणे, तसेच शेतकर्‍यांना दर्जेदार वाण उपलब्ध होण्यासाठी पैदासकारांनी सातत्याने प्रयत्न करावेत, असे यावेळी आवाहन करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande