
अमरावती, 30 डिसेंबर (हिं.स.)। शेतीची दिवसभराची कष्टाची मेहनत संपवून घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्यावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना अचलपूर तालुक्यातील कारणबाग शेत शिवारात घडली. प्रमोद शिवहरी मेहरे उर्फ बाबू (रा. नौबागपुरा, अचलपूर), वय ४० वर्षे यांचा ट्रॅक्टर अपघातात जागीच मृत्यू झाला असून, त्यांच्यासोबत ट्रॅक्टरवर बसलेला गुलाब नामक मजूर गंभीर जखमी झाला आहे.प्रमोद मेहरे यांनी गिरीष खंडेलवाल (रा. च्यावलमंडी) यांच्या कारणबाग शेत शिवारातील शेती लागवडीचे काम घेतले होते. आज सोमवारी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास शेतातील कापूस वेचून कापसाचे गाठोडे ट्रॅक्टरवर घेऊन ते घरी परतत होते. मात्र सापण नदी पात्राजवळून जात असताना नदीकाठचा कठडा अचानक खचला आणि ट्रॅक्टर थेट नदीत कोसळला.या भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्याने प्रमोद मेहरे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत ट्रॅक्टरवर बसलेला गुलाब हा मजूर गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.प्रमोद मेहरे हे कष्टकरी, मनमिळावू व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली मृत्यूने नौबागपुरा परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतीकामासाठी रोज जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्दैवी घटनेबाबत पुढील तपास पोलीस करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी