पाकिस्तानच्या विरोधात मोठे राजनैतिक पाऊल
नवी दिल्ली, 23 एप्रिल (हिं.स.) : पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत झालेल्या सीसीएसच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार भारताने सिंधू करार पुढे ढकलला असून पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करत 48 तासात भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्यासोबतच पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करण्यास आंगण्यात आले आहे. सीसीएसच्या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाचे विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विक्रम मिस्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 7 लोककल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी कॅबिनेट सुरक्षा समितीची सुमारे अडीच तास बैठक झाली. सीसीएच्या बैठकीत पाकिस्तानच्या विरोधात 5 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार पाकिस्तान सीमापार दहशतवादाला विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. तसेच पंजाबच्या अटारी येथील एकात्मिक तपासणी चौकी तात्काळ बंद केला जाईल. ज्यांनी कायदेशीररित्या सीमा ओलांडली आहे त्यांना 1 मे 2025 पूर्वी त्या मार्गाने परत येता येईल. त्याचप्रमाणे सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. भूतकाळात पाकिस्तानी नागरिकांना दिलेले कोणतेही एसपीईएस व्हिसा रद्द मानले जातील. एसपीईएस व्हिसाखाली भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी 48 तासांचा कालावधी आहे.
त्याचप्रमाणे नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना अयोग्य व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याला भारत सोडण्यासाठी एक आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. तसेच भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून आपले संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार मागे घेईल. संबंधित उच्चायोगांमध्ये ही पदे रद्द मानली जातील. यासोबतच सैन्याच्या तिन्ही दलांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मिस्त्री यांनी सांगितले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी