अहिल्यानगर दि. 26 एप्रिल (हिं.स.) :- नागरिकांना पाणीपट्टी भरमसाठ आकारण्यात आली आहे. मग त्यांना सुरळीत पाणीपुरवठा केला पाहिजे, परंतु असे होताना दिसत नाही. गेल्या अनेक दिवसापासून शहरात विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वन वन भटकंती करावी लागत आहेत. पाण्यासाठी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. नळाला पाणी आले, तर ते कमी दाबाने येत आहे. उन्हाळ्यात नागरिकांचे असे हाल करणे दुर्दैवी आहे. सामान्य नागरिकाला दिवसाआड पाणी मिळत आहे, ते ही वेळेवर आणि पुरेसे नाही, ही परिस्थिती केवळ प्रशासनाची उदासीनता नव्हे, तर नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा अपमान आहे, असे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
शहरातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिले व चर्चा केली.पुढे बोलताना फुलसौंदर म्हणाले की, मनपा प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, हीच आमची मागणी आहे. आम्ही आज जे निवेदन देत आहोत, ते केवळ एक कागदाचा तुकडा नाही. ती लाखो नागरिकांची आर्त हाक आहे. लवकरात लवकर पाणी प्रश्नावर तोडगा काढून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा झाला पाहिजे नाहीतर नागरिकांसह शहरात जल आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या निवेदनात म्हटले की, गेल्या पंधरा वीस दिवसांपासून महानगरपालिकेचा पाणी पुरवठा व्यवस्थापन संपुर्ण शहरात विस्कळीत झाले आहे. शहराचे उपनगर असलेले केडगाव, सावेडी, बोल्हेगाव, नागापुर, सावित्रीबाई फुलेनगर, विनायकनगर, फुलसौदंर मळा, बुरुडगाव रोड, तसेच नगर शहरामधील मध्य वस्तीत पाणीपुरवठा होत नाही. ऐन ऊन्हाळयाच्या दिवसात सर्व नागरीकांना पिण्याच्या पाण्याची गरज असतानाच पालिकेकडून त्यांना पाणि उपलब्ध होत नाही. कर्मचा-यांचे फोन बंद असतात. विचारणा केल्यास उडवाउडवी ची उत्तरे मिळतात. तरी आपण स्वतः लक्ष घालुन पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा नागरीकासंह जन आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni