रत्नागिरी, 10 मे, (हिं. स.) : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ऐतिहासिक सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच २५ हजारांहून साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हा दिव्य शंखनाद हा रामराज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल. या महोत्सवासाठी जिल्ह्यातून १ हजार ३०० हून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी रत्नागिरीतील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्हमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख गणेश गायकवाड, शिवचरित्र कथाकार अरविंद बारस्कर, रत्नागिरी येथील प्रसिद्ध उद्योजक अनंत आगाशे, हिंदु जनजागृती समितीचे संजय जोशी, सनातन संस्थेचे महेंद्र चाळके उपस्थित होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे सनातन संस्था आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त देशात रामराज्य-स्वरूप ‘सनातन राष्ट्रा’साठी सामूहिक संकल्प केला आहे. याद्वारे सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटना यांच्यातील धर्मबंधुत्व अधिक दृढ होईल. सध्याच्या भारतासमोर उभ्या असलेल्या अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सनातन धर्म, त्याची मूल्ये आणि त्याचे रक्षण नितांत आवश्यक झाले आहे. एकूणच गो, गंगा, गायत्री, मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणार्या ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. गोव्यात होणारा भव्य लोकोत्सव धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित करणारा ठरणार आहे.
या महोत्सवाला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी, पतंजली योगपीठाचे संस्थापक प.पू. योगऋषि स्वामी रामदेवजी, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पूज्यश्री देवकीनंदन ठाकूर महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तेलंगणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे अधिवक्ता विष्णु जैन आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी