रायगड, 1 जून (हिं.स.)।
‘‘राज्यातील साडेचार कोटी कामगारांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विविध योजनांचा लाभ घेऊन कामगारांनी आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन सुसंस्कारी पिढी घडवावी त्यासाठी योजनांचा लाभ उपयोगी ठरेल,’’ असे मत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी येथे व्यक्त केले.
मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांना मोफत गृह उपयोगी संच वाटप व आरोग्य शिबीराचे आयोजन पिंपळदरी येथे करण्यात आले होते. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात १० नोंदीत कामगारांना साहित्य वाटप झाले. गृहपयोगी संचात थाळ्या, वाटया, ग्लास, प्रेशर कुकर सह आदी ३० साहित्य आहे.
कामगार मुलांच्या शिक्षणासाठी, पत्नी किंवा तीच्या गरोदरपणात अर्थिक मदत, आरोग्यासाठी ५ लाखांचा विमा, मृत्यू पश्चात अर्थिक मदत अशा योजनांमधून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मदत देत आहे.
योजनेची माहिती ग्रामीण भागात सर्वांना समजावून सांगून गोरगरीब मजुरांपर्यंत ही योजना प्रचार करून यशस्वी अंमलबजावणी करिता सरपंच, उपसरपंच यांनी शासनास सहकार्य करावे, असे मंत्री गोगावले यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने