मुंबई , 13 जून (हिं.स.): शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी लंडनमध्ये पोहचला असून, संघाने सरावही सुरू केला आहे.पण, याचदरम्यान संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हा सामना सोडून भारतात परतला आहे. गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तो तातडीने भारतात परतला असल्याची माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गंभीर ७ जून रोजी संघासह लंडनला पोहोचला. संघ सध्या बेकेनहॅममध्ये सराव करत आहे. आज(दि.१३) पासून अंतर्गत सराव सामना खेळला जाणार होता, परंतु त्यापूर्वी गौतम गंभीरला भारतात परतावे लागले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे गौतम गंभीरची आई सीमा यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्या धोक्याबाहेर आहेत. त्यामुळे गंभीर २० जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडमध्ये संघासोबत परतण्याची अपेक्षा आहे.
भारतीय क्रिकेट संघाने १८ वर्षांपासून इंग्लंडमध्ये कोणतीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. या काळात एमएस धोनी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने इंग्लंडमध्ये २-२ कसोटी मालिका खेळल्या, त्यापैकी ३ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला, तर १ अनिर्णित राहिली. आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्वाचे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode