रत्नागिरी, 15 जून, (हिं. स.) : कुरधुंडा (ता. संगमेश्वर) येथील मुंबई-गोवा महामार्गावर उभारलेल्या भल्या मोठ्या संरक्षण भिंतीला तडे गेले असून ही भिंत कोणत्याही क्षणी कोसळण्याची श्यक्यता आहे. ही भिंत कोसळली तर प्रवासी तसेच स्थानिक ग्रामस्थांचे जीव धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम कित्येक वर्षे सुरू असून निकृष्ट कामाची अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आली आहेत. महामार्गावरील खड्डे, चिखलमय झालेले रस्ते, रस्त्यावर साचलेले पाणी, चुकीचे वळणरस्ते यामुळे रोज अपघात होत आहेत. तरीही प्रशासन आणि ठेकेदाराकडून या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. कुरधुंडा येथील हजरत इशामुद्दीन दर्ग्यासमोर महामार्गाला सुमारे १०० मीटरहून अधिक लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी उभारलेल्या या संरक्षक भिंतीची स्थिती भीतिदायक आहे. या भिंतीला तडे गेले असून ती एका बाजूने बाहेरच्या दिशेला सरकत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष गेलेले नाही.
भिंत कोसळली, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. भिंतीच्या समोरच दर्गा असून तेथे रोज भावीक येत असतात. आजूबाजूच्या शेतात व लोकवस्तीत जाण्यासाठी पूर्वीपासूनचा रस्ता असल्याने वाहन तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. धोकादायक झालेल्या भिंतीला लागूनच राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावरून वाहनांची येजा सतत सुरू आहे. अशा परिस्थितीत भिंत कोसळली तर मोठी हानी होण्याची श्यक्यता आहे. यासंदर्भात कुरधुंडा ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली असून संबंधित संरक्षक भिंतीची परिस्थिती तसेच उद्भवणारा धोका याकडे लक्ष वेधले आहे. तसेच या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची व संबंधितावर कारवाईची मागणीही केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी