अहिल्यानगर 2 जून (हिं.स.) : नगर शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या विनापरवाना आणि धोकादायक होर्डिंगवर कारवाई करावी व एकाच ठिकाणी 10 वर्षापासून कार्यरत असलेल्या 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहिल्यानगर येथील कर्मचाऱ्यांची बदली करण्याच्या मागणीसाठी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, जिल्हा सचिव हजरत शेख, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, शाहीर कान्हू सुंबे, संदीप गायकवाड, दत्ता वामन, दीपक वर्मा, सुभाष काकडे, सुखदेव पवार आदी उपस्थित होते.नगर शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना आणि धोकादायक होर्डिंग उभ्या राहिल्या असून, त्याकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी सुरक्षा नियम धाब्यावर बसवून, विद्युत महावितरणच्या परवानगीविना अनधिकृत होर्डिंग उभारले गेले आहेत. विनापरवाना होर्डिंगच्या एजन्सीवर गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहिल्यानगर येथील ज्या कर्मचाऱ्यांना बदलीचा कालावधी पूर्ण झालेला असून, ते मागील दहा वर्षापासून त्याच ठिकाणी काम करत आहे. वेळोवेळी उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचलनालय यांच्याशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून प्रतिसाद मिळालेला नाही. सदर प्रकरणी तक्रारीची चौकशी करुन, त्या चौकशीचा केवल फार्स करण्यात आला आहे. चौकशी अहवाल अद्याप तक्रारदार यांना देण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.10-10 वर्षे सलग एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची जिल्हा बाहेर बदली करावी, त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, 2015-16 मधील बोगस भरती प्रकरणी ज्या कर्मचाऱ्यांचे नावे एफआयर मध्ये आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तीके त गुन्ह्यांची नोंद तात्काळ करण्यात यावी, वरिष्ठ लिपिक व त्यांची पत्नी दोन्हीही शासनाचे नियम डावलून एचआरए भत्ता घेत असून, त्याची देखील चौकशी करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ---------------------
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni