नवी दिल्ली , 6 जून (हिं.स.)
अकरा वर्षांपूर्वी बंद पडलेली
चॅम्पियन्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा नव्या रुपात येणार असल्याची चर्चा क्रिकेट
वर्तुळात सुरु झाली आहे. ईसीबी म्हणजे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ, वर्ल्ड
क्लब चॅम्पियनशीपचे आयोजन पुन्हा करण्यात यावे, यासाठी विचाराधीन आहे. लीग सुरु
होण्याबाबतच्या चर्चा प्राथमिक स्तरावर होत असल्या तरी लवकरच याबाबत काहीतरी ठोस निर्णय
घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी
रिचर्ड गूल्ड यांनी ही योजना सध्या विचाराधीन असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे
भविष्यात पुरुष आणि महिलांसाठी वर्ल्ड क्लब चॅम्पियनशीप निश्चित होईल. ते आमचं
पुढचं पाऊल असेलं असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. चॅम्पियन्स लीग टी-२० ची सुरुवात
२००९ मध्ये झाली होती. तर २०१४ मध्ये ही स्पर्धा शेवटची खेळवण्यात आली होती.
चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत २०१४ या स्पर्धेचं जेतेपद
पटकावलं होतं. ही स्पर्धा सुरु होती त्यावेळी भारताकडून तीन, ऑस्ट्रेलिया आणि
दक्षिण आफ्रिकेकडून प्रत्येकी दोन, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि पाकिस्तानकडून प्रत्येकी
एक संघाचा समावेश होता.
रोडावलेली प्रेक्षकसंख्या आणि
व्यवसायिक कारणांमुळे ही लीग बंद करण्यात आली होती. त्यावेळी या स्पर्धेला अपेक्षित यश मिळालं नसल्याची कबुली
ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गूल्ड यांनी दिली आहे. दरम्यान, वर्ल्ड क्लब
चॅम्पियनशीपसाठी भारताच्या १० पैकी ८ फ्रँचायझींचा होकार आवश्यक आहे. कारण या
फ्रँचायझींनी इतर देशातील लीगमध्येही गुंतवणूक केली आहे. वर्ल्ड क्लब चॅम्पियनशीमुळे
जर क्रिकेट या खेळाचा फायदा होत असेल तर याचा भविष्यात विचार केला जाऊ शकतो. असे
संकेत आयपीएल चेअरमन अरुण धुमाळ यांनी दिले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra