नवी दिल्ली, 7 जून (हिं.स.)
टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला
इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे लागणार आहे. एक कर्णधार आणि
एक फलंदाज म्हणून गिलची या दौऱ्यात चांगलीच कसोटी असेल. त्यातच गेल्या १८
वर्षांपासून भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे जे
महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीला जमले नाही ते शुभमन गिल करुन दाखवणार का ? याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचं लक्ष
असेल.
भारताने २००७ मध्ये राहुल द्रविडच्या
नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये १-० ने कसोटी मालिका जिंकली होती. विशेष म्हणजे या
कसोटी मालिकेतील विजयी संघात भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीरही होते. मात्र,
त्यानंतर टीम इंडियाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत विजय साकारता आला नाही. २०११
आणि २०१४ मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा दौरा केला
होता. त्या दौऱ्यातही भारताच्या पदरी निराशाच पडली होती. विराट कोहलीच्या
नेतृत्वाखाली २०१८ आणि २०२२ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. २०१८
मध्ये भारताला कसोटी मालिकेत १-३ पराभूत व्हावं लागलं होतं. तर २०२२ मधील कसोटी
मालिका भारताने २-२ ने बरोबरीत सोडवली होती.
महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या दोन दिग्गजांना
इंग्लंडच्या धरतीवर कसोटी मालिका विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे भारताचा युवा
कर्णधार शुभमन गिलच्या भारतीय संघाकडे हा इतिहास बदलण्याची नामी संधी आहे. भारताला
ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये १-३ पराभव सहन करावा लागला होता. या दौऱ्यात
आर. अश्विनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तर इंग्लंड दौरा सुरु
होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा केला. आता या
तीन अनुभवी क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत गिल आणि गंभीर जोडी भारताला १८ वर्षांनी
कसोटी मालिका जिंकून देण्यात यशस्वी ठरते का ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra