'अशी ही साता-याची त-हा-!'
आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा साता-यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्याचा योग जुळून आला आहे. त्यानिमित्ताने साहित्य, चित्रपट, कविता यातील ''अशी ही साता-याची त-हा''! मराठी साह
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन


आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा साता-यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्याचा योग जुळून आला आहे. त्यानिमित्ताने साहित्य, चित्रपट, कविता यातील 'अशी ही साता-याची त-हा'!

मराठी साहित्य व्यवहारातील 'कुंभमेळा' अशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ओळख आहे. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या साहित्य संमेलनाचा आता 'इव्हेंट' झाला असून हे संमेलन राजकारण्यांच्या ताब्यात गेले आहे. साहित्य संमेलन आणि वाद ,कार्यक्रमातील साचेबद्धपणा हे नेहमीचे रडगाणे असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही मराठी साहित्य व्यवहारातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदा सातारा येथे साहित्य संमेलनाचा फड रंगणार आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर

सातारा शहराला ऐतिहासिक वारसा असून हे शहर कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसले आहे. छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हे साता-याच्या गादीचे पहिले संस्थापक. १८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९ असा त्यांचा कार्यकाळ होता. १७०८ मध्ये त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. ब्रिटिशांच्या काळात सातारा हे एक अग्रगण्य संस्थान म्हणून ओळखले जात होते.‌ शहराभोवती असलेल्या सात किल्ल्यांवरून शहराला सातारा हे नाव मिळाले.‌ प्रत्येक शहराची स्वतःची काही ना काही अशी स्वतंत्र ओळख असते. अजिंक्यतारा किल्ला, व्योम धरण, कास पठार, सज्जनगड, ठोसेघर धबधबा, जरंडेश्वर हनुमान, बारा मोट्याची विहीर, ही साताऱ्या जवळील काही प्रसिद्ध ठिकाणे सातारा शहर आणि जिल्ह्याची मुख्य ओळख ठरली आहेत. सातारी कंदी पेढे आणि सातारी जर्दा ही सुद्धा साता-याची वेगळी ओळख आहे.

साहित्य, चित्रपटातील सातारा

'सातारा' हे नाव असलेला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 'अलगूज' कादंबरीवर आधारित 'अशी ही साता-याची त-हा' हा चित्रपटही सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. अरुण सरनाईक, उमा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरलीधर कापडी यांनी केले होते. चित्रपटातील 'परभणीहुनी कुणी आलेत पाहुणे मला घालाया मागणी, काय करू काय करू' हे गाणे प्रसिद्ध आहे. (https://youtu.be/q7tTNzfDX5w?feature=shared या लिंकवर हे गाणे पाहता व ऐकता येईल.)

अशाच एका अत्यंत लोकप्रिय गाण्यात/ लावणीत 'सातारा' आलेला आहे. 'सांगत्ये ऐका' चित्रपटातील 'बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला गं जाता साताऱ्याला ' हे ते गाणे. आज इतक्या वर्षांनंतरही गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.‌ (https://youtu.be/lSLMTR0tCZY?feature=shared या लिंकवर क्लिक करून हे गाणे ऐकता येईल.)

गदिमांचा 'जोगिया'

'आधुनिक वाल्मिकी' अशी ओळख असलेले कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर यांचा 'जोगीया' हा पहिला काव्यसंग्रह. यातील १६ कविता संगीतबद्ध करून एक सांगितिक अल्बम प्रकाशित झाला आहे. गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी या अल्बमची निर्मिती केली असून सुरेश देवळे यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. श्रीधर फडके रवींद्र साठे उत्तरा केळकर चारुदत्त आफळे, ज्ञानदा परांजपे यांनीही गाणी गायली आहे. चारुदत्त आफळे यांची किर्तनकार/ प्रवचनकार अशी महाराष्ट्राला ओळख आहे. मात्र या आल्बममध्ये आफळे बुवांनी चक्क गदिमांनी लिहिलेली 'ही घोळ निऱ्यांचा पदी अडखळे, जलद चालणे जरा, दिसे ही साताऱ्याची तऱ्हा' ही लावणी गायली आहे. लावणीचे शब्द, संगीत आणि स्वर एकदम फक्कड आहेत. रसिक वाचकांना ही लावणी https://www.gadima.com/jogia/index.php#google_vignette या लिंकवर ऐकता येईल.

साताऱ्यात होणारे ४ थे साहित्य संमेलन

आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. या आधीही तीन संमेलने साता-यात झाली होती. १८७८ मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी 'ग्रंथकार संमेलन' सुरु केल्यानंतर १९०५ मध्ये तिसरे संमेलन रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते. १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४ वे तर १९९३ मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात झाले होते.

सातारा येथे होणाऱ्या आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनाचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनला मिळाला आहे.

असाही एक योगायोग

सातारा येथे होणारे नियोजित ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे. १९९३ साली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच ठिकाणी झाले होते. हे स्टेडियम १४ एकरात असून तिथे एक मुख्य मंडप, दोन अन्य मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर परिसंवाद/कार्यक्रम करण्यासाठी तीन सभागृहेही उपलब्ध आहेत. स्टेडियममध्ये २५ हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी आहे. स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर आहे.‌ स्टेडियमच्या मागील बाजूस पोलीस परेड ग्राउंडची मोठी जागा असून त्याचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे.

- शेखर जोशी

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande