पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झाले. वटवृक्ष आणि वटपौर्णिमा यांचे महत्त्व सनातन संस्थेच्या वतीने संकलित केलेल्या या लेखातून समजून घेऊया. प्रस्तुत लेखात त हे व्रत कसे साजरे करावे ? हे आपण समजून घेणार आहोत.
1. तिथी - वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात.
2. उद्देश - सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.
3. सावित्रीचे महत्त्व - भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते.
4. व्रताची देवता - वटपौर्णिमा या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून सत्यवान, नारद आणि यमधर्म या उपांग (गौण) देवता आहेत.
5. वटवृक्षाचे महत्त्व - यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले.
6. वटपौर्णिमा या व्रताचे महत्त्व
शिवरूपी वडाची पूजा करणे, म्हणजे त्या वडाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची करूणामय भावाने पूजा करणे होय. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ति आणि शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला लाभ मिळण्यास साहाय्य होते; म्हणून या दिवशी वडरूपातील शिवाला स्मरून पतीला दिर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना करून कर्माला शक्ति-शिव यांची जोड देऊन ब्रह्मांडातील शिवतत्त्वाचा यथायोग्य लाभ करून घ्यायचा असतो.
7. वटपौर्णिमा या व्रताच्या पूजनामध्ये पाचच फळे अर्पण करण्यामागील शास्त्र
‘कोणत्याही पूजाविधीत पाच फळे अर्पण करण्याला महत्त्व आहे. फळे ही मधुर रसाशी, म्हणजेच आपतत्त्व दर्शक असल्याने पाच फळांच्या समूच्चयाकडे आकृष्ट आणि प्रक्षेपित होणार्या देवतांच्या लहरी अल्प कालावधीत जिवाच्या कोषांपर्यंत झिरपू शकतात. यामुळे जिवाला देवतेच्या चैतन्य लहरींचा खोलवर आणि दीर्घकाळ लाभ मिळण्यास साहाय्य होते; कारण जिवाचा देह हाही पृथ्वी आणि आपतत्त्वात्मक आहे.’
8. वटपौर्णिमा हे व्रत करण्याची पद्धत
संकल्प - प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा.
पूजन - वडाचे षोडशोपचारे पूजन करावे. पूजेत अभिषेक झाल्यानंतर वडाला सूत्रवेष्टन करावे, म्हणजे वडाच्या खोडाभोवती सुती धाग्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा गुंडाळावे. पूजेच्या शेवटी ‘अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, तसेच धनधान्य आणि कुल यांची वृद्धी होऊ दे’, अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात.
उपवास - स्त्रियांनी संपूर्ण दिवस उपवास करावा. (अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणजे अंनिसचे कार्यकर्ते ‘वटपौर्णिमा’ म्हणजे निवळ ‘भाकडकथा’ असा प्रचार करतात. कणाकणांत देवतांचे अस्तित्व मानून वृक्षदेवतेची पूजा करायला शिकवणारा महान हिंदु धर्म कुठे, तर हिंदु धर्माला असत्य ठरवणारे असे बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मद्रोही आणि साम्यवादी कुठे !)
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते ’
संपर्क : 9920015949
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी