अकोला, 1 जुलै, (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत ‘पूर्णे’च्या पात्रात पाण्याचा विसर्ग सोडला जाऊ शकतो. त्यामुळे पूर्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या धरणाची जलाशय पाणीपातळी ४४८.१५ मी. एवढी असून, टक्केवारी ५७.२० टक्के आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या होत असलेला पाऊस व पुढे होण्याची शक्यता पाहता जलसाठ्यात वाढ होऊ शकते. त्यामुळे पूर्णा नदीच्या पात्रात विसर्ग सोडण्याची शक्यता पाहता नदीकाठावरील गावकरी, मासेमार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात जाण्यास, नदीपात्र ओलांडण्यास मनाई करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे