रत्नागिरी, 1 जुलै, (हिं. स.) : चिपळूण सायकलिंग क्लबच्या २४ सदस्यांनी सलग तिसऱ्या वर्षी चिपळूण ते पंढरपूर ही सायकलवारी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
शेकडो किलोमीटरचा हा प्रवास केवळ शारीरिक क्षमतेची कसोटी नव्हता, तर श्रद्धा, जिद्द आणि संघभावनेचा अद्वितीय संगम ठरला.
यावर्षीच्या वारीस आयोजक प्रसाद आलेकर व विक्रांत आलेकर यांच्या घरापासून सुरुवात झाली. प्रसाद आलेकर यांच्या मातोश्रींनी सर्व वारकऱ्यांचे औक्षण करून वारीची मंगल सुरुवात केली. शिवसृष्टी येथे पहिला थांबा घेऊन सायकलरिंगण करण्यात आले. त्यानंतर पृथ्वी पाटील यांच्या शिवगर्जनेने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने वारीला खऱ्या अर्थाने गती मिळाली.वारीचा पहिला दिवस चिपळूण ते विटा असा १४० किलोमीटरचा होता. रात्री विटा येथे त्यांनी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी विटा ते पंढरपूर असा ११६ किलोमीटरचा प्रवास करत ते विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले.या वारीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ऊन, वारा, पाऊस, कुंभार्ली घाटातील खराब रस्ते, वेळोवेळी होणारी सायकल्सची पंक्चरिंग या सर्व अडथळ्यांवर मात करत वारकरी ज्ञानोबा-तुकारामच्या गजरात पंढरपुरात पोहोचले. ही वारी केवळ एक सायकलप्रवास नव्हता, तर तो भक्ती, निष्ठा आणि चिकाटीचा प्रवास ठरला.
आयोजक आणि क्लबचे सहसचिव प्रसाद आलेकर, अध्यक्ष विक्रांत आलेकर, उपाध्यक्ष प्रशांत दाभोळकर, मनोज भाटवडेकर, कार्यकारिणी सदस्य योगेश ओसवाल, स्वप्नील गायकवाड, अमित पेडणेकर, मनोज नितोरे, डॉ. सचिन खेडेकर, चैतन्य गांगण, संदीप राणे, शौरी राणे, अंकुश जंगम, राघव खर्चे, पृथ्वी पाटील, अजित जोशी, श्रीकांत जोशी, हेमंत भोसले, अथर्व भोसले, संजयकुमार कदम, राजेंद्र नाचरे, सुयोग शिंदे, सुयोग पटवर्धन, बेटी सावंत या २४ सायकलपटूंनी वारीत सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी