रत्नागिरी, 1 जुलै, (हिं. स.) : शेतकऱ्यांच्या मागणीला कृषी विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून युरियाचा संरक्षित साठा खुला करण्यात आला आहे. शी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांमध्ये १२२९७ टन खतांचा सरासरी वापर झाला. त्याआधारे केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यामध्ये ९० टक्के खते उपलब्ध झाली आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी गट /समूहांकरिता कृषी विभाग, खरेदी विक्री संघ, वि. का. से. सोसायटी यांच्याद्वारे बांधावर खते, बियाणे, निविष्ठा वितरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण १५३७ गावांपैकी ८१४ गावांमध्ये ४४९ गटांमार्फत बांधावर खते / निविष्ठा वितरण करण्यात आले असून, सामूहिक खरेदीमुळे आर्थिक बचतीसह वेळेची बचत झाली आहे.
जिल्ह्यासाठी सन २०२५-२६ खरीप हंगामाकरिता युरिया, डीएपी, संयुक्त खते, एसएसपी इत्यादी १२९०८ टन खते मंजूर आहेत. त्यापैकी ६९८४ टन युरिया उपलब्ध आहे.
यापुढे भात पिकाकरिता व फळझाडांच्या खते भरणीकरिता आवश्यक असलेली आणखी खते उपलब्ध व्हावीत, यासाठी जिल्हास्तरावरून कृषी विभाग प्रयत्नशील आहे. वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता भातपिकासाठी युरिया खत उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ५०० टन बफर स्टॉकमधील ४१६ टन युरियाचा साठा खुला करून देण्यात आला आहे. याचा फायदा जिल्ह्यामधील दुर्गम भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच इतर शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी