अहिल्यानगर, 1 जुलै (हिं.स.)।नगर शहरात पावसाळा सुरू झाल्यानंतर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील विविध भागांत पावसाचे पाणी साचल्याने दूषित पाणी व डासांची उत्पत्ती यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. शहर व उपनगरातील विविध कॉलनीत पाणी साचणे, निर्माण झालेले डबके आणि नाले तुंबल्यामुळे डासांची संख्या वाढली आहे.या परिस्थिती मुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरिया यांसारख्या आजारां चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. डास निर्मूलनासाठी शहर व उपनगरा तील आवश्यक असलेल्या भागांमध्ये धूर फवारणी करणे, साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी औषध फवारणी करणे, साथीच्या आजारांचे नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र आरोग्य मोहीम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni