मनमाड, 6 जुलै (हिं.स.)।
येथील वखार महामंडळाच्या गोदामातून चोरट्यांनी तब्बल सात कोटींच्या दोन हजार ६५० कापसाच्या गाठी लंपास केल्या. श्रीरामपूरच्या अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेने कापसाच्या या गाठी वखार महामंडळाच्या गोदामात ठेवल्या होत्या. मात्र, सर्व गाठी चोरून नेल्याचा प्रकार घडला.
विशेष म्हणजे, वखार महामंडळाचे हे गोदाम सुरक्षित मानले जाते असे असताना गोदामामधून दोन हजार ६५० गाठी चोरी कशा गेल्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, शहरातील चांदवड रोडवर वखार महामंडळाचे गोदाम असून, त्यात अनेक व्यापारी रासायनिक खते व इतर वस्तू ठेवतात. श्रीरामपूरच्या अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडे तारण असलेल्या सुमारे सात कोटी ४४ लाखांच्या दोन हजार ६५० कापूस गाठी ठेवल्या होत्या. मात्र, त्या चोरांनी लंपास केल्याचे समोर आले. याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक अण्णासाहेब जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI