जालना, 12 ऑगस्ट (हिं.स.) : जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील एका तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता अंत्यविधी उरकून घेतला. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसह दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतल. या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर अंत्यविधी केल्याबाबत वेगळा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री अडीच वाजता मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी भल्या पहाटे चार वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला. मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशान भूमीत धाव घेतली तेव्हा मृतदेह जळत होता. पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्या प्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / KULKARNI AMIT ANIL