आमच्यासाठी सुधारणा म्हणजे सुशासनाचा विस्तार - पंतप्रधान
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.) - आमच्यासाठी सुधारणा म्हणजे सुशासनाचा विस्तार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. चांगले प्रशासन हे आमच्या सरकारांचे वैशिष्ट्य आहे आणि आमच्या कारभारात जनता हाच केंद्रबिंदू आहे. नागरिकांचे जीवन सुलभ करणे ही
पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.) - आमच्यासाठी सुधारणा म्हणजे सुशासनाचा विस्तार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. चांगले प्रशासन हे आमच्या सरकारांचे वैशिष्ट्य आहे आणि आमच्या कारभारात जनता हाच केंद्रबिंदू आहे. नागरिकांचे जीवन सुलभ करणे ही सततची धडपड असल्याचे सांगत हे सरकारच्या धोरणांत व निर्णयांत स्पष्ट दिसून येते असेही त्यांनी नमूद केले.

आज दिल्लीतील रोहिणी येथे सुमारे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, केंद्रीय राज्यमंत्री अजय टम्टा, हर्ष मल्होत्रा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी या ठिकाणांच्या वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाकडे लक्ष वेधले. या द्रुतगती मार्गाचे नाव द्वारका आहे आणि हा कार्यक्रम रोहिणी येथे आयोजित केला जात आहे. पंतप्रधानांनी जन्माष्टमीच्या उत्सवाच्या भावनेवर प्रकाश टाकला आणि आपण स्वतः द्वारकाधीशांच्या भूमीतून आलो आहेत या योगायोगाचा त्यांनी उल्लेख केला. संपूर्ण वातावरण भगवान श्रीकृष्णाच्या भावनेने ओथंबून गेले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

ऑगस्ट महिना स्वातंत्र्य आणि क्रांतीच्या रंगांनी रंगलेला आहे यावर प्रकाश टाकून पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजादी का महोत्सव साजरा होत असताना राष्ट्रीय राजधानी दिल्ली आज विकास क्रांतीची साक्षीदार होत आहे. त्यांनी माहिती दिली की, आज सकाळीच, दिल्लीला द्वारका एक्सप्रेस वे आणि अर्बन एक्सटेंशन रोडद्वारे वाढीव संपर्क सुविधा मिळाली आहे ज्यामुळे दिल्ली, गुरुग्राम आणि संपूर्ण एनसीआर प्रदेशातील लोकांची मोठी सोय होईल. यामुळे कार्यालये आणि कारखान्यांमध्ये जाणे सोपे होईल, प्रत्येकाचा वेळ वाचेल, असेही ते म्हणाले. या संपर्क सुविधेचा व्यापारी, उद्योजक आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल यावर पंतप्रधानांनी भर दिला. या आधुनिक रस्ते पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी दिल्ली-एनसीआरमधील सर्व रहिवाशांचे अभिनंदन केले.

15 ऑगस्ट 2025 रोजी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात देशाची अर्थव्यवस्था, आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वासाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले होते, “आजचा भारत आपल्या आकांक्षा, स्वप्ने आणि संकल्पांनी परिभाषित केला आहे - ज्याचा अनुभव आता संपूर्ण जग घेत आहे”. ते म्हणाले की जेव्हा जग भारताकडे पाहते आणि त्याच्या प्रगतीचे मूल्यांकन करते तेव्हा त्यांची पहिली नजर राष्ट्रीय राजधानी दिल्लीवर पडते. मोदी यांनी दिल्लीला विकासाचे एक मॉडेल म्हणून विकसित करण्याची गरज अधोरेखित केली, जेणेकरून प्रत्येकाला खरोखर जाणवेल की ही एका आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि विकसित होत असलेल्या भारताची राजधानी आहे.

गेल्या 11 वर्षांत, सरकारने ही प्रगती साध्य करण्यासाठी विविध पातळ्यांवर सातत्याने काम केले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी अधोरेखित केले की संपर्क सुविधेच्या बाबतीत, दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या दशकात अभूतपूर्व सुधारणा झाली आहे, आज या भागात रुंद आणि आधुनिक द्रुतगती मार्ग आहेत. “मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत दिल्ली-एनसीआर आता जगातील सर्वात जास्त संपर्कव्यवस्था असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे”, असेही पंतप्रधान म्हणाले. तसेच हा प्रदेश नमो भारत जलद रेलसारख्या प्रगत प्रणालींनी सुसज्ज आहे. गेल्या 11 वर्षांत दिल्ली-एनसीआरमध्ये प्रवास करणे पूर्वीच्या काळाच्या तुलनेत खूपच सोपे झाले आहे यावर त्यांनी भर दिला.

दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा संकल्प सरकारने कायम राखला असल्याचे त्यांनी सांगितले. आज प्रत्येकाने ही प्रगती प्रत्यक्ष पाहिली आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. द्वारका एक्सप्रेसवे आणि अर्बन एक्सटेंशन रोडचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी सांगितले की दोन्ही रस्ते उत्कृष्ट दर्जाचे बांधले गेले आहेत. पेरिफेरल एक्सप्रेसवेनंतर, अर्बन एक्सटेंशन मार्ग आता दिल्लीच्या पायाभूत सुविधा आणि संपर्क सुविधेचा महत्त्वपूर्ण आधार देईल, असे ते म्हणाले.

अर्बन एक्सटेंशन रोडचे एक प्रमुख वैशिष्ट्य अधोरेखित करताना, पंतप्रधान म्हणाले की दिल्लीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून मुक्त करण्यास देखील या मार्गाने मदत केली आहे. अर्बन एक्सटेंशन रोडच्या बांधकामात लाखो टन कचरा वापरण्यात आला आहे, असे ते म्हणाले. कचऱ्याचे ढिगारे कमी करून हा कचरा रस्ते बांधणीसाठी पुन्हा वापरला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. जवळच्या भालस्वा कचराभूमीकडे लक्ष वेधून आणि त्या परिसरात राहणाऱ्या कुटुंबांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांची दखल घेत पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील रहिवाशांना अशा आव्हानांपासून मुक्त करण्यासाठी सरकार सक्रियपणे काम करत आहे, असे सांगितले.

पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले की रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकार यमुना नदीच्या स्वच्छतेचे काम सातत्याने करत आहे. यमुना नदीतून आता पर्यंत 16 लाख मेट्रिक टन गाळ काढून टाकण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अल्पावधीतच दिल्लीत 650 देवी (दिल्ली इलेक्ट्रिक व्हेईकल इंटरकनेक्टर) इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. शहरातील इलेक्ट्रिक बसेसचा ताफा लवकरच 2000 चां आकडा ओलांडण्याची अपेक्षा आहे, या उपक्रमामुळे ग्रीन दिल्ली - क्लीन दिल्ली या मंत्राला बळकटी मिळते यावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये अनेक वर्षांनंतर त्यांच्या पक्षाचे सरकार स्थापन झाले असल्याचे नमूद करताना पंतप्रधानांनी पूर्वीच्या सरकारांच्या कारभारावर तीव्र टीका केली आणि दिल्लीच्या विकासाचा अत्यंत मंद वेग यासाठी त्यांना जबाबदार ठरवले. त्यांनी मान्य केले की, पूर्वीच्या सरकारांच्या गोंधळातून दिल्लीला उभे करणे ही कठीण जबाबदारी आहे, परंतु सध्याचे सरकार दिल्लीचा अभिमान आणि विकास परत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील.

दिल्लीतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या आणि कायमस्वरूपी निवासस्थान नसलेल्या नागरिकांना आता पक्की घरे मिळत आहेत, हेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ज्या भागांमध्ये पूर्वी वीज, पाणी, गॅस जोडणी यांसारख्या मूलभूत सुविधा नव्हत्या, त्या ठिकाणी आता या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. राष्ट्रीय प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, गेल्या 11 वर्षांत विक्रमी प्रमाणात रस्ते बांधले गेले आहेत. देशभरातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण सुरू असून वंदे भारतसारख्या आधुनिक गाड्यांचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. तसेच आता लहान शहरांमध्ये विमानतळ विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले. एनसीआरबाबत बोलताना त्यांनी विमानतळांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ अधोरेखित केली. हिंडन विमानतळावरून अनेक शहरांसाठी उड्डाणे सुरू झाली असून नोएडा विमानतळही पूर्णत्वाच्या जवळ आहे, असे त्यांनी नमूद केले.

ही प्रगती मागील दशकात देशाने आपली जुनाट कार्यपद्धती बदलल्यामुळेच शक्य झाली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशाला आवश्यक असलेले पायाभूत सुविधा विकासाचे प्रमाण आणि त्याचा वेग, पूर्वीच्या सरकारांच्या काळात साध्य झाला नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. पूर्व व पश्चिम पेरिफेरल एक्सप्रेसवे चा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, दिल्ली-एनसीआरला या रस्त्यांची गरज अनेक दशकांपासून होती. मागील सरकारच्या काळात या प्रकल्पांच्या फाईल्स सुरू झाल्या, परंतु कामाची खरी सुरुवात तेव्हाच झाली जेव्हा जनतेने त्यांच्या पक्षाला सेवा करण्याची संधी दिली. केंद्र आणि हरियाणा दोन्हीकडे त्यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर हे रस्ते वास्तवात आले, असे त्यांनी अधोरेखित केले. आज हे एक्सप्रेसवे देशाची सेवा करत आहेत याबद्दल पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त केला.

देशातील विकास प्रकल्पांविषयीची उदासीनता केवळ दिल्ली–एनसीआर पुरती मर्यादित नसून ती संपूर्ण देशभर पसरलेली होती, असे अधोरेखित करताना मोदी यांनी सांगितले की पूर्वी पायाभूत सुविधांसाठीचे अंदाजपत्रक फारच कमी असे, आणि मंजूर प्रकल्पदेखील पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागत. त्यांनी नमूद केले की गेल्या 11 वर्षांत पायाभूत सुविधांच्या अंदाजपत्रकात सहापटींहून अधिक वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की आता लक्ष हे प्रकल्पांच्या जलद पूर्ततेवर केंद्रित आहे, आणि त्यामुळे द्वारका एक्स्प्रेसवे सारख्या उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे. या प्रकल्पांमध्ये होणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीमुळे केवळ सुविधा उभ्या राहत नाहीत, तर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे, असे त्यांनी सांगितले. व्यापक बांधकाम कामकाजामुळे मजुरांपासून अभियंत्यांपर्यंत लाखो लोकांना रोजगार मिळतो, हे स्पष्ट करताना मोदी यांनी बांधकाम साहित्याच्या वापरामुळे संबंधित कारखाने आणि दुकाने यांमध्येही रोजगार वाढतो, असे नमूद केले. वाहतूक आणि रसद व्यवस्था क्षेत्रांमध्येही या विकासामुळे रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या काळात जीवन व व्यवसाय सुलभ करण्यासाठी अनेक मोठ्या सुधारणा राबवल्या जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. “या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जीएसटीमध्ये पुढील पिढीची सुधारणा केली जाणार आहे. या दिवाळीत जीएसटी सुधारणांद्वारे नागरिकांना दुहेरी बोनस मिळणार आहे”, असे मोदी म्हणाले. संपूर्ण आराखडा सर्व राज्यांसोबत सामायिक केला असल्याचे सांगून त्यांनी आशा व्यक्त केली की सर्व राज्ये भारत सरकारच्या या उपक्रमात सहकार्य करतील. ही प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी, ज्यामुळे ही दिवाळी अधिक खास होईल, असे आवाहन त्यांनी केले. जीएसटी अधिक सुलभ करणे व करदरांचा पुनर्विचार करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगून पंतप्रधानांनी या सुधारणेचे फायदे प्रत्येक घरापर्यंत, विशेषतः गरीब व मध्यमवर्गापर्यंत पोहोचतील, असे अधोरेखित केले. लहान–मोठे उद्योजक, व्यापारी व व्यवसायिक यांनाही या बदलांचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.

भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची प्राचीन संस्कृती व वारसा, असे अधोरेखित करताना मोदी यांनी सांगितले की ही सांस्कृतिक परंपरा ही जीवनाचे गहन तत्वज्ञान मांडणारी आहे. या तत्वज्ञानात आपल्याला “चक्रधारी मोहन” आणि “चरखाधारी मोहन” या दोघांचीही अनुभूती होते, असे त्यांनी नमूद केले. या दोन प्रतिमा वेळोवेळी राष्ट्रासमोर प्रकट होतात, असे त्यांनी स्पष्ट केले. “चक्रधारी मोहन” म्हणजे भगवान श्रीकृष्ण, ज्यांनी सुदर्शन चक्राचे सामर्थ्य दाखविले, तर “चरखाधारी मोहन” म्हणजे महात्मा गांधी, ज्यांनी चरख्याद्वारे स्वदेशीचे सामर्थ्य राष्ट्राला दाखवून दिले, असे पंतप्रधान म्हणाले.

भारताचे मेड इन इंडिया यूपीआय हे आज जगातील सर्वात मोठे ‘रिअल-टाइम डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म’ बनले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी भारतीय बनावटीचे रेल्वेचे डबे आणि इंजिन यांना आता परदेशातही वाढती मागणी आहे, हे अधोरेखित केले.

“दिल्ली ही भारताचा गौरवशाली भूतकाळ आणि आशादायी भविष्य यांना जोडणारी राजधानी म्हणून उदयाला येत आहे,” असे सांगताना पंतप्रधानांनी नवीन केंद्रीय सचिवालय—कर्तव्य भवन—आणि नवीन संसद भवनाच्या पूर्णत्वाचा उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की कर्तव्य पथ आता नव्या रूपात राष्ट्रासमोर उभे आहे. मोदी म्हणाले की भारत मंडपम आणि यशोभूमी यांसारखी आधुनिक परिषद केंद्र दिल्लीचा दर्जा उंचावत आहेत. त्यांनी अधोरेखित केले की हे विकास दिल्लीला व्यवसाय आणि वाणिज्यासाठी एक प्रमुख ठिकाण बनवत आहेत. या उपक्रमांच्या सामर्थ्य आणि प्रेरणेतून दिल्ली जगातील सर्वोत्तम राजधानींपैकी एक बनेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande