जळगाव - संतापलेल्या ग्राहकाने 12 गावांचा वीज पुरवठा पाडला बंद
जळगाव, 6 ऑगस्ट, (हिं.स.) राज्यात महावितरणकडून नवीन टीओडी मीटर बसविले जात आहे. मात्र या नवीन वीज मीटरमुळे अनेकांच्या वीजबिलाबाबत तक्रारी आहेत. यातच मीटर रीडिंगसह वीज बिलाबाबत असलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला शिवी
जळगाव - संतापलेल्या ग्राहकाने 12 गावांचा वीज पुरवठा पाडला बंद


जळगाव, 6 ऑगस्ट, (हिं.स.) राज्यात महावितरणकडून नवीन टीओडी मीटर बसविले जात आहे. मात्र या नवीन वीज मीटरमुळे अनेकांच्या वीजबिलाबाबत तक्रारी आहेत. यातच मीटर रीडिंगसह वीज बिलाबाबत असलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यासह वीज ग्राहकाने मीटर फोडले. तसेच परिसरातील १२ गावांचा वीज पुरवठा संतापाच्या भरात जवळपास तासभर बंद पाडला. या प्रकरणी जळगाव औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात त्या ग्राहकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील जळके येथील राकेश रमेश पाटील यांनी नवीन टीओडी मीटर बसविल्यानंतर जास्त वीजबिल येत असल्याची तक्रार जळगाव ग्रामीण उपविभागाकडे केली होती. या तक्रारीचे निवारण करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रदीप सुनील खवडे (२४, रा. पळासखेडा मिराचे, ता. जामनेर) हे राकेश पाटील यांच्या घरी गेले.

वीज मीटरचे रीडिंग व वीज बिलात असलेले रीडिंग सारखे असल्यामुळे वीजबिल कमी करू शकत नाही, असे प्रदीप खवडे यांनी राकेश पाटील यांना सांगितले. राकेश याने ‘मला माझे जुने मीटर लावून द्या’ असे म्हणून कर्मचाऱ्यांसोबत वाद घालून त्यांच्या घरात बसविण्यात आलेल्या टीओडी मीटरची तोडफोड केली. तेवढ्यावरच न थांबता महावितरणच्या वावडदा येथे असलेल्या ११ केव्ही वीज उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीवर लोखंडी सळई फेकून मारली. ज्यामुळे परिसरातील जवळपास १२ गावांचा वीज पुरवठा बंद पडला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तब्बल तासभर वीजपुरवठा खंडीत झाला. जो सुरळीत करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. घडल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन महावितरणच्या जळगाव ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता व्ही. एस. कापुरे यांच्या सूचनेवरून जळगाव येथील औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संबंधित ग्राहकाच्या विरोधात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्या ग्राहकाच्या विरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. दरम्यान, नागरिकांनी टीओडी मीटर संदर्भात काही अडचणी असल्यास संयम बाळगून शांततेच्या मार्गाने तक्रारी कराव्यात. तक्रारींचे निरसन करण्यासाठी महावितरणे कर्मचारी प्रत्यक्ष मीटरची पाहणी करतील. ग्राहकांनी त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. कायदा हातात घेऊन महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान किंवा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणच्या जळगाव ग्रामीण उपविभागाकडून आता करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande