रत्नागिरी, 7 ऑगस्ट, (हिं. स.) : जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (वय ६३) या धामणवणे (ता. चिपळूण) येथील महिलेचा खून झाला आहे. पाय बांधलेल्या अवस्थेत घरातच मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
आज, गुरुवारी सकाळी धामणवणे खोतवाडी (ता. चिपळूण) येथे घटना उघडकीस आली. श्वानाने मृतदेहाजवळून धामणवणे रस्त्याने डोंगरावरील एका फार्महाऊसपर्यंत धाव घेतली. त्यामुळे मारेकरी जंगलाच्या दिशेने पळाल्याचा अंदाज असून हा खून असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले असून या प्रकरणी एका जवळच्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा खून कोणी आणि कशासाठी केला याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मूळच्या गोंधळे येथील रहिवासी वर्षा जोशी या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या. त्या ६ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या पतीचे २०११मध्ये निधन झाले. धामणवणे येथील घरी त्या एकट्याच राहत होत्या. आजच त्या मैत्रिणींबरोबर पिठापूर येथे सहलीसाठी जाणार होत्या. त्यासाठी त्यांनी सर्व तयारीदेखील केली होती. काल सायंकाळपर्यंत त्या सर्वांच्या संपर्कात होत्या. परंतु रात्री त्यांचा संपर्क झाला नाही. बुधवारी रात्री वर्षा जोशी यांना त्यांची मैत्रीण तोरस्कर सतत फोन करत होत्या, परंतु कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्यांनी वर्षा जोशी यांचे शेजारी शिरीष चौधरी यांना फोन केला आणि माहिती घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांच्या घराचा दर्शनी दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे संशय बळावला आणि शेजारी तसेच येथील सरपंचांनी मागील दरवाजा बघितला असता तो उघडा होता. शेजारी घरात जाताच हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जलदगतीने तपास सुरू केला आहे. श्वानपथकासह ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी