छत्रपती संभाजीनगर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी व व्यापारी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी छत्रपती संभाजी नगर येथील जिल्हाधिकारी यांना काँग्रेसचे लोकसभा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी तातडीचे पत्र दिले आहे .
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे विशेषतः पैठण तालुक्यात तसेच इतर तालुक्यांमध्ये शेती, घरे, गोठे, जनावरे आणि व्यापारी आस्थापने यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावरील ऊसासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या गंभीर परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन बाधित शेतकरी व व्यापारी वर्गास मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांना खालील मागण्या केल्या आहेत – सर्व बाधित गावांमध्ये तातडीने पंचनामे करून अचूक नुकसानीचे सर्वेक्षण करावे. शेतकरी व व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने वितरीत करून आर्थिक मदत द्यावी.जनावरांचे मृत्यू, गोठे व घरे यांचे नुकसान, तसेच पिकांचे नुकसान याचा स्वतंत्र अहवाल तयार करून योग्य ती भरपाई द्यावी. संपूर्ण प्रक्रिया जलद व पारदर्शक पद्धतीने करून बाधितांना तातडीने दिलासा मिळावा.शेतकरी व व्यापारी बांधवांवर आलेले हे संकट मोठे आहे, आणि त्यातून सावरण्यासाठी शासनाने त्वरित व प्रभावी पावले उचलावीत, ही आमची ठाम मागणी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis