पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यभरात ‘सेवा पंधरवडा २०२५’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी होणार असून त्याची राज्यस्तरीय सुरुवात पुण्यातून होत आहे. राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (दि. १७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (दि. २ ऑक्टोबर) या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महसूल विभाग थेट जनतेच्या दैनंदिन प्रश्नांशी निगडित असल्याने, लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम प्रशासनाचा अनुभव नागरिकांना मिळावा या उद्देशाने या पंधरवड्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महसूल विभागाने १ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश काढून ‘सेवा पंधरवाडा’ युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी तीन टप्प्यांची आखणी करण्यात आली आहे.
🔹 पहिला टप्पा – १७ ते २२ सप्टेंबर : *पाणंद रस्ते विषयक मोहीम*
पाणंद व शिवार रस्त्यांना क्रमांक देणे
सर्वेक्षण करून नोंद न झालेल्या रस्त्यांची नोंद घेणे
शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन
शेतरस्त्यांवरील वाद मार्गी लावण्यासाठी रस्ता अदालतांचे आयोजन
🔹 दुसरा टप्पा – २३ ते २७ सप्टेंबर : *‘सर्वासाठी घरे’ उपक्रम*
सरकारी जमीन कब्जहक्काने घरकुलांसाठी उपलब्ध करून देणे
झोपडपट्टी किंवा अतिक्रमणांना नियमांनुसार नियमित करणे
पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप मोहीम
🔹 तिसरा टप्पा – २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर : *नावीन्यपूर्ण उपक्रम*
जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन नवनवीन कल्पना राबवणार.
या उपक्रमातून जनतेचे प्रश्न प्रत्यक्षात सोडवले जातील आणि पारदर्शक प्रशासनाचा अनुभव मिळेल, असा विश्वास महसूल विभागाने व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु