नांदेड, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
तालुक्यातील भालकी परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आसना नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुराच्या पाण्यामुळे मौजे भालकी शिवारातील शेतांमधील आखाड्यावर तब्बल २४ नागरिक अडकून पडले होते. त्यामध्ये ३ लहान मुले, ८ महिला आणि १३ पुरुष यांचा समावेश होता.
घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच उपविभागीय अधिकारी श्री. सचिन खल्लाळ व तहसीलदार श्री. संजय वारकड यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने एसडीआरएफ पथकाला संपर्क केला. तात्काळ दोन बोटींसह एसडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरा अंधारात तब्बल दहा वाजेपर्यंत चाललेल्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्व २४ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या प्रसंगी आमदार श्री बालाजीराव कल्याणकर हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.
बचावकार्य संपल्यानंतर सर्व नागरिकांना सुरक्षित निवारा केंद्रावर नेण्यात आले. तेथे त्यांच्यासाठी जेवण व झोपण्याची योग्य सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.
या धाडसी बचावकार्यात एसडीआरएफ पथकासोबत स्थानिक अधिकारी व ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये मंडळ अधिकारी तरोडा श्री. शिवानंद स्वामी, मंडळ अधिकारी श्री. कुणाल जगताप, तलाठी श्री. गोपीनाथ कल्याणकर, श्री. अविनाश करंदीकर, कृषी सहाय्यक श्री. वसंत जारिकोटे, तसेच श्री. प्रभाकर शेजुळे (सरपंच चिखली बुद्रुक), श्री. राजू धाडवे (सरपंच भालकी), श्री. गणेश धाडवे, श्री. लक्ष्मण कल्याणकर व समस्त गावकऱ्यांनी मोठी मदत केली.
प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादामुळे आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे मोठा अनर्थ टळला असून या बचाव कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis