
जयपूर, 14 जानेवारी (हिं.स.)।राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात बुधवारी एक भीषण अपघात घडला आहे. फतेहपूर उपविभागातील हरसावा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर कार आणि ट्रक यांच्यात भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीस ठाण्याचे अधिकारी सुरेंद्र देगडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात वशीम (पुत्र मनीर खान), सोनू (कन्या सुरेंद्र) आणि बरखा (पत्नी ओमप्रकाश) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत तर संतोष (पत्नी सत्यनारायण माळी), तुळसी देवी (पत्नी ललित), मोहन देवी (पत्नी महेश), इंद्रा (कन्या महेश), आशा (पत्नी मुरारी) आणि चंदा (पत्नी सुरेंद्र) या महिलांचा मृत्यू झाल आहे. या सर्व महिला फतेहपूर परिसरातील रहिवासी होत्या. या महिला रघुनाथपूर येथून लक्ष्मणगढ येथे एका बैठकीस उपस्थित राहून कारने परतत होत्या, त्याच वेळी हरसावा गावाजवळ एनएच–52 वर वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.
अपघातानंतर तात्काळ स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेद्वारे फतेहपूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना सीकर येथे पाठवण्यात आले. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग–52 वर सुमारे अर्धा तास वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच फतेहपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रक आणि कार रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत केली. मृतांचे मृतदेह फतेहपूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode