
लातूर, 17 जानेवारी, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, प्रशासनाने कंबर कसली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, १३ जानेवारीपासून संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
या काळात निवडणुका पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत विशेष 'आचारसंहिता कक्ष' कार्यान्वित करण्यात आला आहे.
प्रशासकीय यंत्रणा आणि जबाबदाऱ्या
निवडणूक प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे:
नोडल अधिकारी: ए. जे. तडवी (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. लातूर)
सहायक नोडल अधिकारी: जावेद शेख (जिल्हा कार्यक्रम अधिकारी)
कार्यवाही पथक: प्रदीप बोंबले, बालाजी पोतदार, विष्णू शिंदे, राहुल सुतार आणि गणेश लोणकर.
गैरप्रकारांना चाप बसणार !
केवळ जिल्हा स्तरावरच नव्हे, तर प्रत्येक तालुका स्तरावरही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
नागरिकांना आवाहन:
निवडणूक प्रक्रियेदरम्यान कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास, सजग नागरिक म्हणून त्वरित जिल्हा आचारसंहिता कक्षाशी संपर्क साधावा.
सर्वांसाठी नियम सारखेच !
राजकीय पक्ष, उमेदवार आणि समर्थकांसाठी आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचाराच्या पद्धती, सभा आणि खर्चावर प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis