
मुंबई, 21 जानेवारी (हिं.स.)। भारतीयांना आवड आणि जबाबदारी यांचा समतोल साधण्यासाठी प्रेरित करणारी ‘जॉली अँड पॉली’ ही नवी ब्रँड मोहीम एसबीआय लाइफ इन्शुरन्सने सादर केली आहे. या मोहिमेसाठी क्रिकेट सुपरस्टार ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते अनुक्रमे ‘जॉली’ आणि ‘पॉली’ या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. भारतातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफने या मोहिमेद्वारे जीवन विम्याला केवळ आर्थिक साधन न मानता, स्वप्ने साकार करण्याची ताकद देणारा आधार म्हणून मांडले आहे.
‘अपने लिए, अपनों के लिए’ या ब्रँड तत्त्वज्ञानावर आधारित ही मोहीम वैयक्तिक आकांक्षा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्यात कोणतीही तडजोड न करता दोन्ही एकत्र साध्य करता येतात, हा संदेश देते. जीवन विम्यामुळे कुटुंबाचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते आणि त्यामुळे व्यक्तींना त्यांच्या आवडी-निवडी आत्मविश्वासाने जोपासता येतात, ही मध्यवर्ती भूमिका ‘जॉली’ आणि ‘पॉली’ या पात्रांद्वारे मांडण्यात आली आहे.
ऋषभ पंतने साकारलेला ‘जॉली’ हा उत्साही, आशावादी आणि आयुष्य मनापासून जगण्याचा दृष्टिकोन दर्शवतो. नियोजन म्हणजे स्वातंत्र्यावर मर्यादा नव्हे, तर ते जपण्याचे साधन आहे, हा विचार तो सहजतेने मांडतो. तर रवींद्र जडेजाने साकारलेला ‘पॉली’ हा शांत, समंजस आणि दूरदृष्टीचा प्रतिनिधी आहे. तो विचारपूर्वक नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करत, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि कौटुंबिक सुरक्षा यांना एकत्र बळ देतो.
या मोहिमेअंतर्गत एसबीआय लाइफने दैनंदिन भारतीय वातावरणाशी जोडलेल्या दोन टीव्ही जाहिराती सादर केल्या आहेत. पहिल्या जाहिरातीत एका तरुणीने कुस्तीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतल्याने कुटुंबात निर्माण झालेली चिंता दाखवण्यात आली आहे. ‘जॉली’ आणि ‘पॉली’ कुटुंबाला समजावतात की, आर्थिक सुरक्षा सुनिश्चित असल्यास ती निश्चिंतपणे आपले स्वप्न पूर्ण करू शकते. दुसऱ्या जाहिरातीत एक पुरुष महिलांच्या हक्कांशी संबंधित कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतो, मात्र कुटुंबाच्या भविष्यासंबंधी चिंता निर्माण होते. तेव्हा जीवन विम्यामुळे मिळणारी सुरक्षितता व्यक्तींना त्यांच्या आवडी जोपासण्याचे स्वातंत्र्य कसे देते, हे प्रभावीपणे दाखवले जाते. “करो पूरे अपने इरादे, अपनों से किए सभी वादे” या संदेशाने या जाहिराती संपतात.
या मोहिमेच्या लाँचिंगवेळी एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे ब्रँड, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि सीएसआर प्रमुख रवींद्र शर्मा यांनी सांगितले की, बदलत्या पिढ्यांसोबत भारतातील महत्त्वाकांक्षा देखील बदलत आहेत. आजचा भारतीय अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण जीवन जगू इच्छितो, मात्र त्याचवेळी कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडेही सजग आहे. जीवन विमा हा हा समतोल साधण्याचा प्रभावी मार्ग असल्याचा विश्वास ‘जॉली अँड पॉली’ मोहिमेतून सोप्या भाषेत मांडण्यात आला आहे.
ब्रँड ॲम्बेसेडर ऋषभ पंत म्हणाले की, देशातील तरुणांची स्वप्ने मोठी आहेत आणि त्यांना पाठिंबा देणे हीच खरी ताकद आहे. स्वतःच्या आवडीचा पाठपुरावा करताना कुटुंबाच्या सुरक्षिततेची खात्री असणे महत्त्वाचे असून, या मूल्यांशी एसबीआय लाइफची भूमिका पूर्णपणे जुळते. तर रवींद्र जडेजा यांनी सांगितले की, या मोहिमेमुळे देशभरातील कुटुंबांशी संवाद साधण्याची संधी मिळते. विचारपूर्वक नियोजन केल्यास वैयक्तिक स्वप्ने आणि कौटुंबिक ध्येय यांचा समतोल साधणे केवळ शक्यच नाही, तर ते सबलीकरण करणारेही ठरते.
‘जॉली अँड पॉली’च्या माध्यमातून एसबीआय लाइफ दीर्घकालीन कथाविश्व उभारत असून, जीवनातील विविध टप्प्यांवर विश्वासार्ह भागीदार म्हणून स्वतःला अधिक ठळकपणे सादर करत आहे. महत्त्वाकांक्षा आणि तयारी यांचा समतोल साधण्यातूनच खरी प्रगती साध्य होते, हा विश्वास या मोहिमेतून दृढपणे पुढे येतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule