
छत्रपती संभाजीनगर, 28 जानेवारी (हिं.स.)। चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तर दर्जेदार चित्रपटाच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन व नितीमूल्यांची शिकवण देण्यात आली आहे, असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’चित्रपट रसास्वाद’ विषयक कार्यशाळा घेण्यात आली. कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी ’एमजीएमफिल्म इन्टिटयूट’चे संचालक डॉ.शिव कदम, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांची मंचावर उपस्थिती होती. महात्मा फुले सभागृहात आयोजित या कार्यशाळेस विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, सिनेमा हे अत्यंत गंभीर व प्रभावी जनजागृतीचे माध्यम आहे. माणसाच्या जडणघडणीतील कला, साहित्य, संस्कृती या क्षेत्राचे महत्व आहे. सत्यजित राय, श्याम बेनेगल, व्ही.शांताराम यांनी सामाजिक विषय अत्यंत चांगल्या रितीने चित्रपटातून हाताळले. ’शोले’ सारखा हिंदी चित्रपट मैलाचा दगड असून तो प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय समजत नाही. त्यामुळे चित्रपटाचा आस्वाद प्रत्यक्ष चित्रपट गृहात जाऊन घ्यावा, असेही ते म्हणाले. अजिंठा-एलोरा चित्रपट महोत्सव ख-या अर्थाने ’ग्लोबल’ झाल्याचेही ते म्हणाले. तर चित्रपट हे अत्यंत प्रभावी लोक माध्यम असून गांर्भीर्याने पाहण्याची गोष्ट आहे, असे डॉ.शिव कदम म्हणाले. अध्यक्षीय समारोपात डॉ.प्रशांत अमृतकर यांनी विविध चित्रपटांचा आस्वाद घेतल्याबद्दल उदाहरणासह माहिती दिली. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यशाळा घेण्यात आल्याचे डॉ.कैलास अंभुरे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis