
परभणी, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।
पालम तालुका येथे सोमवारी (दि. २३) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसासह जोरदार वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीस आलेली ज्वारी, गहू व हरभरा ही पिके जमीनदोस्त झाली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. सोमवारी अचानक आभाळ दाटून येत वारा सुटल्याने उभी पिके आडवी पडली. हरभऱ्याचे वाळलेले घाटे गळून पडले, तर गव्हाच्या ठुशीत पाणी शिरल्याने नुकसान वाढले. अनेक शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांच्या खळ्यांनाही फटका बसला. आनंदवाडी, चाटोरी, बोरगाव, बंदरवाडी, खडी, नाव्हा, नाव्हलगाव व कांदलगाव या गावांमध्ये मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis