
जळगाव, 26 फेब्रुवारी (हिं.स.) जळगाव शहरासह जिल्ह्यात फेब्रुवारी संपत असतानाच उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून पारा ३५ अंशाच्या वर गेल्यानं दुपारच्या वेळी बाहेर पडणे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. सकाळी सौम्य गारवा जाणवत असला तरी दुपारी मात्र कडक उन्हामुळे जळगावकरांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.गुरुवारी जळगावचे कमाल तापमान थेट ३५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले. तर किमान तापमान १८.३ अंश सेल्सिअस असले तरी, आता सकाळचा गारवा पूर्णपणे ओसरला असून दिवसा कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत.
फेब्रुवारीच्या अखेरीस अशा प्रकारे पारा चढल्याने आगामी मार्च आणि एप्रिल महिन्यात तापमान ४५ अंशांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.कोरड्या उन्हापेक्षा जळगावकरांना सध्या दमट हवेचा त्रास अधिक जाणवत आहे. ६८ टक्के सापेक्ष आर्द्रता असल्यामुळे हवेत प्रचंड उष्मा आहे. यामुळे अंगाची लाहीलाही होत असून पंखे आणि कुलरची हवादेखील तोकडी पडू लागली आहे. दुपारच्या वेळी मुख्य बाजारपेठेतील वर्दळ कमी झाली असून रस्ते ओस पडू लागले आहेत
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर