
मुंबई, १० मार्च (हिं.स.) - राज्यातील निर्धन, कामगार आणि गरजू व्यक्तींना अल्प शुल्कात भोजन उपलब्ध करून देणारी ‘शिवभोजन थाळी’ योजना अखंडपणे चालू राहील, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली. शिवभोजन केंद्र चालकांच्या थकित अनुदानाच्या प्रश्नावर विचारण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
सदस्या श्रीमती सना मलिक आणि सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी ही लक्षवेधी मांडली होती. या वेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, शिवभोजन ही लोककल्याणकारी योजना असून सध्या राज्यात १,८७३ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. या माध्यमातून प्रतिदिन अनुमाने २ लाख नागरिक या सुविधेचा लाभ घेत आहेत. केंद्र चालकांचे अनुदान प्रलंबित राहू नये, यासाठी शासन पूर्णतः दक्षता घेत आहे. ही योजना अखंड चालू रहावी यासाठी चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) ७० कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले होते. आणि वाढती व्याप्ती लक्षात घेता सुधारित अर्थसंकल्पात अतिरिक्त १२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी