
त्र्यंबकेश्वर , 12 मार्च (हिं.स.)।
काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या कार्यशाळेतून वर्षभरातील पक्ष संघटनेचे कामकाजाची रुपरेषा ठरवून त्यामार्गाने मार्गक्रमण करण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकार विरोधात लढणे, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच काँग्रेसचा विचार अधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी या कार्यशाळेत मंथन केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीसाठी त्र्यंबकेश्वर येथील श्रीचंद लॉन्स येथे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील आदी उपस्थित होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, २०१४ पासून एक ५६ इंचाच्या छातीचा व्यक्ती अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आला पण विकासाचे दाखवलेले स्वप्न फुसका बार ठरला. भाजपा खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करत आहे, ही हुकूमशाही संपुष्टात आणली पाहिजे. सरकार हे लोकशाही व संविधानानुसार चालला पाहिजे, काँग्रेस पक्षाने याच मुल्याने कारभार केला. आज लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. भाजपाच्या सत्ता, संपत्ती व अहंकाराच्या बुलडोझर समोर काँग्रेसचा कार्यकर्ता निर्धाराने लढला. सरकारी यंत्रणा व पैशाचा वारेमाप वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा लढला. इंग्रजाविरोधात स्वातंत्र्य सैनिक लढले त्याच त्वेषाने काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता लढला. जे यश मिळाले ते वाखण्याजोगे आहे. हा लढा असाच पुढे सुरु ठेवायचा आहे आणि पक्षासाठी कटीबद्ध होवून संघटनेसाठी काम करा, पक्षाला गतवैभव नक्की प्राप्त होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV