
बीड, 17 मार्च, (हिं.स.)। जिल्ह्यातील जलप्रकल्पांना आता उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात ४० टक्क्यांनी मोठी घट झाली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ६० टक्के पाणीसाठा शिल्लक असून वाढत्या मागणीसह बाष्पीभवनामुळे ही पातळी अधिकच खाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्हयातील एकूण १४३ प्रकल्पांपैकी एकही प्रकल्प सध्या पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. सुदैवाने, मांजरा धरणात ७२ टक्के तर बिंदुसरा धरणात ५१ टक्के साठा उपलब्ध असल्याने बीड शहराला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा आणि नळांना तोट्या बसवून पाण्याची नासाडी टाळावी, असे आवाहन प्रशासकीय अधिकारी प्रेमलता पारवे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis