
रत्नागिरी, 18 मार्च, (हिं. स.) : जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात ४ तालुक्यांतील ३३६ ठिकाणचे पाणी नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्यापैकी तपासणीत १० ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळले आहेत. त्याचे प्रमाण २.९८ टक्के असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
सर्वाधिक दूषित नमुने चिपळुणात ६, गुहागरात ३ ठिकाणचे पाणी दूषित आढळले आहे. त्यामुळे या परिसरातील हातपंप, विहिरीचे पाणी पिणे अपायकारक आहे. पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व संनियंत्रण कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर असे वर्षातून दोनदा स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते.
या सार्वजनिक स्रोतांच्या पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण ग्रामपंचायतीमधील जलसुरक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य सेवक यांच्यामार्फत फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले. त्यापैकी ३३६ पाणी नमुने घेण्यात आले. त्यापैकी १० ठिकाणचे पाणी दूषित आढळले असल्याचे सांगण्यात आले. मंडणगड, खेड, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील पाण्याची तपासणी झाली नाही.
दपोलीतील ८६ ठिकाणी नमुने घेण्यात आले. त्यापैकी १ पाणी नमुना दूषित आढळले असून त्याची टक्केवारी १.१६ आहे. गुहागरात ८९ पैकी ३ नमुने दूषित आढळले. त्याची टक्केवारी ३.३७, चिपळूण तालुक्यात १५७ पैकी ६ पाणी नमुने दूषित (३.८२ टक्के) आढळले. त्यामुळे या तालुक्यातील हातपंप, विहीरीचे पाणी पिणे म्हणजे धोक्याची घंटा असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील जलस्रोतांची तपासणी झाल्यानंतर स्रोतांच्या जोखमीनुसार वर्गीकरण करून व ग्रामपंचायतींना लाल, हिरवे, पिवळे व चंदेरी कार्ड वितरित केले जाते. ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखमींच्या स्रोतांवर अंवलबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला लालकार्ड, ७० हून अधिक लोकसंख्या कमी जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून असल्यास हिरवे कार्ड, कमी जोखमीच्या स्रोतांवर अवंलबून नसल्यास त्याला पिवळे कार्ड दिले जाते. सलग पाच वर्षे साथीचा उद्रेक न होणे, सलग हिरवे कार्ड मिळाल्यास त्या ग्रामपंचायतीस चंदेरी कार्ड देण्यात येते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी