
ठाणे, 18 मार्च (हिं.स.)। स्ट्रोकमुळे मेंदूमृत झालेल्या 60 वर्षीय संजय शहा यांच्या कुटुंबाने सामाजिक भान जपत अवयवदानाचा निर्णय घेतल्याने सात जणांना नवे आयुष्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. कुटुंबीयांनी एकमताने घेतलेल्या या निर्णयातून यकृत आणि मूत्रपिंडांचे दान करण्यात आले, तर कॉर्निया आणि हाडेही दान करण्यात आली. मुंबईत यंदाचे हे 17 वे देहांतर्गत अवयवदान ठरले. ठाणे येथील ज्युपिटर लाइफलाइन रुग्णालयात हा अवयवदानाचा निर्णय प्रत्यक्षात आला. संजय शहा हे पॅथॉलॉजी लॅब चालवत होते. स्ट्रोक आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला डॉक्टरांनी ते 80 टक्के मेंदूमृत अवस्थेत असल्याचे कुटुंबाला सांगितले. काही वेळातच त्यांना पूर्णपणे मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबीयांना अवयवदानाचा पर्याय सुचवला. दरम्यान, पत्नी नम्रता शहा यांनी मुलगा दर्शित शहा याला परिस्थितीची माहिती दिली.
माझ्या वडिलांना कोणतेही व्यसन नव्हते. ते आरोग्याने सुदृढ होते. त्यांचे अवयव दुसर्याच्या आयुष्यासाठी आयुष्यासाठी उपयोगी पडले तर त्यातून मदत होईल, असा आमचा विचार होता. वडिलांची स्वत:ची चॅरिटी संस्था आहे. कोरोनाच्या काळात परिसरातील मृत्यू पाहून त्यांनी समाजसेवेत अधिक लक्ष घातले. प्रयोगशाळेतून केवळ चरितार्थापुरते पैसे घेत उर्वरित चाचण्या अनेकांना मदत म्हणून करून देत असत. - दर्शित शहा, अवयदात्याचा मुलगा.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर