सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ - गुलाबराव पाटील
जळगाव, 20 मार्च (हिं.स.) ग्रामीण भागातील आरोग्य, पोषण व जनजागृती यंत्रणा सक्षम करण्यात पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांचे योगदान अतुलनीय असून त्या शासनाच्या योजनांचे खरे आधारस्तंभ आहेत. त्या खऱ्या अर्थाने फ्रंटलाईन वॉरिय
मंत्री गुलाबराव पाटील


जळगाव, 20 मार्च (हिं.स.) ग्रामीण भागातील आरोग्य, पोषण व जनजागृती यंत्रणा सक्षम करण्यात पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांचे योगदान अतुलनीय असून त्या शासनाच्या योजनांचे खरे आधारस्तंभ आहेत. त्या खऱ्या अर्थाने फ्रंटलाईन वॉरियर्स असून त्यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना थेट घराघरात पोहोचतात. मातां व बालकांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांनी निष्ठेने पार पडत असून कोविडसारख्या कठीण काळातही जीवाची पर्वा न करता सेवा दिल्याने समाजात त्यांच्याबद्दल आदर अधिक दृढ झाला आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यास शासन कटिबद्ध असून त्यांच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

ते पुढे म्हणाले की, गावाच्या विकासाची खरी ताकद म्हणजे या महिला कर्मचारी असून जिल्हा नियोजन समितीमार्फत मागील दोन वर्षांत 231 अंगणवाडी इमारतींसाठी निधी देण्यात आला आहे. उर्वरित 150 अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण करून जळगाव जिल्हा भविष्यात शंभर टक्के अंगणवाडी इमारती असलेला राज्यातील पहिला जिल्हा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डीपीडीसी अंतर्गत 550 स्मार्ट अंगणवाड्यांना मंजुरी, 200 केंद्रांना स्वयंपाकासाठी भांडी, तसेच पंधराव्या वित्त आयोगातून 2179 केंद्रांना लहान मुलांसाठी बनाना शेप बाक सुविधा देण्यात आली आहे. 350 मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या केंद्रांमध्ये रूपांतर करून बालविकासाला चालना देण्यात आली असून मुलांना डिजिटल व आधुनिक शिक्षण देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या एक वर्षातील उल्लेखनीय कार्याचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात तीन पर्यवेक्षिका, 19 अंगणवाडी सेविका, 19 मदतनीस आणि 19 आशा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वावडदे येथील सुरेश पाटील या शेतकऱ्याला ‘आदर्श शेतकरी’ पुरस्कार देण्यात आला. हा सन्मान प्रेरणादायी असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती सक्षम करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जळगाव येथील कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. प्रास्ताविकात महिला व बालविकास अधिकारी हेमंत भदाणे यांनी पुरस्काराची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका अनिता मुगल यांनी केले तर आभार जामनेर येथील सीडीपीओ दमयंती इंगळे यांनी मानले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सांगितले की, बालकांची सेवा हीच खरी सेवा हाच खरा पुरस्कार असून प्रत्येकाने यापुढेही सेवाभावाने काम करण्याचे आवाहन केले. खासदार स्मिताताई वाघ यांनीही सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्या या ग्रामीण प्रशासनाचा कणा असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

यांची होती खास उपस्थिती

खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, अप्पर जिल्हाधिकारी हेमंत हारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, महिला बालविकास अधिकारी हेमंत भदाणे, सौ. वर्षाताई भदाणे, गटविकास अधिकारी विनोद बोढरे, मंजुश्री गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस व आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande