
जळगाव, 23 मार्च (हिं.स.) गेल्या आठवड्यात जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे तापमानात घसरण झाल्याने नागरिकाने उकाड्यातून दिलासा मिळाला होता. मात्र आता महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचे सावट कमी झाले असून, आता उन्हाचा तडाखा वाढणार आहे.अवकाळी पावसाचा जोर ओसरला असला तरीही पाऊस पूर्णपणे संपलेला नाही. आज राज्यातील काहीच ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज हवामान खात्यानं सांगली, सातारा, लातूर जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.मात्र उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका राहणार आहे.जळगाव जिल्ह्यात देखील गेल्या आठवड्यात तापमानात मोठी घसरण दिसून आली. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पारा ४० अंशापर्यंत गेल्याने जळगावकर उष्णतेने हैराण झाला होता. मात्र गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाच्या सावटाने तापमानत घसरण होऊन पारा ३५ अंशाखाली आहे. यामुळे जळगावकरांना उष्णतेतून दिलासा मिळालादरम्यान आता अवकाळी पावसाचे सावट दूर झाले आहे. यामुळे जळगावसह राज्यात उष्णतेचा तडाखा वाढण्याची चिन्हे आहेत. आगामी दिवसांत कमाल तापमानात ३७ अंश ते ४० अंशापेक्षा पेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात उष्णतेची लाट येण्याची चिन्हे आहेत, तर जळगावात पारा चाळीशीच्या वर जाण्याचा अंदाज आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर