
श्रीनगर , 26 मार्च (हिं.स.)।जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पेट्रोल पंपांवरील लांबच लांब रांगांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नागरिकांना पेट्रोल पंपांच्या बाहेर गर्दी करणे आणि तळ ठोकणे थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसे न केल्यास पुढील काही दिवसांसाठी सर्व पेट्रोल पंप बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अब्दुल्ला म्हणाले की, सरकारचे म्हणणे कोणी ऐकत नाही; त्याऐवजी लोक अफवांवरच अधिक विश्वास ठेवतात. अलीकडेच झालेल्या आढावा बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत डिझेल, पेट्रोल किंवा एलपीजी सिलिंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी ठामपणे सांगितले की काही दिवसांनंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही आणि इंधनाचा वापर कमी करण्याबाबत कुठलाही निर्देश देण्यात आलेला नाही. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवून रांगेत उभे राहणाऱ्या लोकांना त्यांनी असे न करण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारच्या अधिकृत माहितीकडे दुर्लक्ष केले जात आहे, तर सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर लोक अधिक विश्वास ठेवत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की तेल आणि गॅसचा प्रत्यक्षात कोणताही तुटवडा नाही. ही बाब मागील आढावा बैठकीतही समोर आली होती. तसेच नागरिकांनी अफवांकडे लक्ष न देता संयम राखावा, असे आवाहन त्यांनी केले.
उमर अब्दुल्ला यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली असून ती उद्या सायंकाळी ६:३० वाजता होणार आहे. या बैठकीत तेही सहभागी होणार आहेत. बैठकीत इराण आणि आसपासच्या प्रदेशातील परिस्थितीवर चर्चा होणार असून कोणती पावले उचलली जात आहेत याचाही आढावा घेतला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode