94 हजार टन एलपीजी घेऊन दोन जहाजे भारताकडे रवाना
नवी दिल्ली , 29 मार्च (हिं.स.)।होर्मुज जलडमरूमध्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशाचे आणखी दोन एलपीजी टँकर सुरक्षितपणे मार्ग पार करून भारताच्या दिशेने येत आहेत. हे टँकर देशाच्या एका द
94 हजार टन एलपीजी घेऊन दोन जहाजे भारताकडे रवाना


नवी दिल्ली , 29 मार्च (हिं.स.)।होर्मुज जलडमरूमध्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशाचे आणखी दोन एलपीजी टँकर सुरक्षितपणे मार्ग पार करून भारताच्या दिशेने येत आहेत. हे टँकर देशाच्या एका दिवसाच्या घरगुती गॅस गरजेइतका एलपीजी साठा घेऊन येत आहेत. दरम्यान, सरकारनेही देशात गॅस आणि इंधनाची कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी घाबरून खरेदी करू नये, असे आवाहन केले आहे.

सरकारी माहितीनुसार, बीडब्ल्यू टीवायआर आणि बीडब्ल्यू ईएलएम नावाची दोन एलपीजी जहाजे सुमारे 94 हजार टन गॅस घेऊन होर्मुज मार्ग सुरक्षितपणे पार करून पुढे निघाली आहेत. बीडब्ल्यू टीवायआर हे जहाज 31 मार्चपर्यंत मुंबईत पोहोचणार असून, बीडब्ल्यू ईएलएम एप्रिलमध्ये न्यू मंगळुरू बंदरात दाखल होणार आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर तसेच इराणच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे या मार्गावरील जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. मात्र आता काही जहाजे सुरक्षितपणे मार्गक्रमण करू लागल्याने परिस्थितीत सुधारणा होत आहे.

यापूर्वीही चार भारतीय टँकर सुरक्षितपणे भारतात पोहोचले आहेत. पाइन गॅस आणि जग वसंत ही जहाजे सुमारे 92,612 टन गॅस घेऊन 26 ते 28 मार्चदरम्यान भारतात दाखल झाली. तसेच एमटी शिवालिक आणि एमटी नंदा देवी ही जहाजे याआधी गुजरातमधील मुंद्रा आणि कांडला बंदरात पोहोचली होती. त्यामुळे देशातील गॅस पुरवठ्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

भारत आपल्या सुमारे 60 टक्के घरगुती गॅस गरजा आयातीद्वारे पूर्ण करतो. गेल्या वर्षी देशात 33.15 दशलक्ष टन एलपीजीची खपत झाली होती, त्यापैकी सुमारे 90 टक्के गॅस पश्चिम आशियातून आयात केला जातो. त्यामुळे होर्मुज मार्ग बंद झाल्यास भारताच्या पुरवठ्यावर थेट परिणाम होतो. सध्या भारत अमेरिका आणि अर्जेंटिना यांसारख्या देशांकडूनही गॅस आयात करत आहे.

दरम्यान, सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क (एक्साइज ड्यूटी) प्रति लिटर 10 रुपयांनी कमी केले आहे. तसेच डिझेल आणि एटीएफवरील निर्यात शुल्क वाढवण्यात आले आहे. गॅस क्षेत्रात घरगुती वापर आणि वाहतूक क्षेत्राला 100 टक्के पुरवठा केला जात असून उद्योगांना मर्यादित गॅस दिला जात आहे. एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी पीएनजी जोडण्यांची गतीही वाढवण्यात आली आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. दररोज 55 लाखांहून अधिक सिलेंडरचे वितरण केले जात आहे. मात्र अफवांमुळे काही ठिकाणी गर्दी दिसून आली. नागरिकांनी घाबरून खरेदी न करता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सरकारने आवाहन केले आहे.

सरकारच्या माहितीनुसार, अजूनही 18 भारतीय जहाजे आणि 485 खलाशी पश्चिम फारसच्या आखातात आहेत. काही जहाजे अजूनही होर्मुज परिसरात परिस्थिती सामान्य होण्याची प्रतीक्षा करत आहेत. डीजी शिपिंग विभाग 24 तास कार्यरत असून आतापर्यंत 900 हून अधिक खलाशांना सुरक्षित परत आणण्यात आले आहे. देशातील सर्व बंदरांवरील कामकाज सध्या सुरळीत सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande