
भारताच्या चित्ता संवर्धन वाटचालीतला हा एक ऐतिहासिक क्षण : भूपेंद्र यादव
भोपाळ, 11 एप्रिल (हिं.स.)। मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात, गामिनी - केजीपी 12 या भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला आहे. ही मादी चित्ता गामिनीच्या पहिल्या वितातील (पहिल्यांदा जन्म दिलेल्या पिल्लांच्या समूहातील) दुसरे पिल्लू असून, तिचे वय 25 महिने आहे. ही घटना भारताच्या चित्ता संवर्धनाच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या घटनेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
या घटनेसंदर्भातली माहिती, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमावर सामायिक केली असून, ही घटना कुनो राष्ट्रीय उद्यान आणि देशाच्या वन्यजीव संवर्धन प्रयत्नांमधील मैलाचा दगड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गामिनीची भारतात जन्मलेली मादी चित्ता, गेल्या एक वर्षांपेक्षा जास्त काळापासून इथल्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात वावरत आहे. या मादी चित्त्याने नैसर्गिक वातावरण आणि स्थितीत यशस्वीपणे चार बछड्यांना जन्म दिला. ही घडामोड चित्ता पुनर्वसन कार्यक्रमातील एक मोठा टप्पा ठरला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चित्त्यांचे भारतातील अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी 2022 मध्ये भारतात चित्ता पुनर्वसनाला सुरूवात झाल्यापासून, चित्त्यांच्या नैसर्गिक अधिवासात नोंदवला हा पहिलाच जन्म आहे, यासोबतच भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याच्या बाबतीतीलही ही अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात अधोरेखित केले आहे. भारतातील नैसर्गिक परिस्थितीत चित्त्यांचे अस्तित्व टिकवणे आणि त्यांचे प्रजनन होत राहील हे सुनिश्चित करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट असून, ही उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक मोठे यश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या यशस्वी घटनेतून भारतीय पर्यावरणीय परिस्थितीसोबत जुळवून घेण्याच्या दृष्टीने चित्त्यांमधील वाढती क्षमता दिसून येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासोबतच या घटनेतून कुनो राष्ट्रीय उद्यानातील संवर्धन आणि विज्ञाननिष्ठ व्यवस्थापनासाठी केल्या जात असलेल्या शाश्वत प्रयत्नांना यश मिळत असल्याचेही यातून दिसून येते असेही त्यांनी म्हटले आहे.
समाज माध्यमावरील आपल्या संदेशातून केंद्रीय मंत्री मंत्री भूपेंद्र यादव यांनी चित्ता संवर्धन कार्यक्रमात सहभागी असलेले वन्यजीव व्यवस्थापक, पशुवैद्यक आणि क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या समर्पित आणि अथक परिश्रमांचीही प्रशंसा केली आहे. ही घटना देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. यासोबतच त्यांनी या प्रकल्पाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule