
जळगाव, 17 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील पहूर येथे लग्नाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी झालेल्या लग्नानंतर नवरीने संपूर्ण कुटुंबाला गुंगीचे औषध देत रोकड आणि दागिने घेऊन फरार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या पायल हरिदास तिजारे (वय २७) हिने स्वतःच्या आईच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत लग्नासाठी तयारी दर्शवली. तिने अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. चर्चेनंतर २ लाख २० हजार रुपयांवर व्यवहार ठरला आणि ३० मार्च रोजी पहूर येथील रवींद्र प्रभाकर काळे यांच्याशी तिचा विवाह पार पडला. मात्र, लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच,मध्यरात्री पायलने थंडपेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून पतीसह घरातील पाच सदस्यांना दिले. सर्वजण बेशुद्ध झाल्यानंतर तिने घराला बाहेरून कडी लावली आणि रोकड तसेच दागिने घेऊन तेथून पलायन केले. दरम्यान, लग्नानंतर काही दिवसांतच नवरीच्या पर्समध्ये जुने आणि नकली मंगळसूत्र आढळल्याने तिचे याआधीही लग्न झाले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकारामागे एक टोळी सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकूण ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नवरी पायल तिजारेसह काही एजंट, नातेवाईक आणि सहकारी यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर