एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
पुणे, 17 एप्रिल (हिं.स.)। : अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) सर्व विभागांमध्ये जास्तीत जास्त उपयोग करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार आरोग्य विभाग या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्
Jsks


पुणे, 17 एप्रिल (हिं.स.)।

: अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) सर्व विभागांमध्ये जास्तीत जास्त उपयोग करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार आरोग्य विभाग या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्यावतीने आयोजित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबीपीएमजेएवाय) आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) अंतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’चे उद्घाटन येथील कॉनरॅड हॉटेलमध्ये आज त्यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील कुमार बर्नवाल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिन ई. रविंद्रन, एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे राज्य मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, देशातील विविध राज्यांतील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ व धोरणकर्ते, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर म्हणाल्या, प्रतिबंध हाच आजार न होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे आरोग्य विभाग प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रात बदल घडून येत आहेत. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग नागरिकांना जास्तीत जास्त चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी केला जात असून महाराष्ट्र हे मेनोपॉज क्लिनिक सुरु करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. जानेवारीपासून या क्लिनिकला सुरुवात झाली असून आतापर्यंत सतरा हजारांपेक्षा अधिक महिलांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आयोजित या चिंतन शिबिराचा पुढील दिशा ठरविण्यासाठी निश्चित उपयोग होईल, असा विश्वासही श्रीमती बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

डॉ. बर्नवाल म्हणाले, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे नागरिकांचा आरोग्य सेवेवरील स्वतःच्या खिशातून होणारा खर्च लक्षणीयरित्या कमी झाला आहे. या योजनाच्या माध्यमातून ११ कोटींहून अधिक रुग्णांवर उपचार झाले आहेत. एआय सारखी उदयोन्मुख तंत्रज्ञान गंभीर आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मदत करू शकतात. आरोग्य क्षेत्रामध्ये एआयच्या वापरासाठी राष्ट्रीय धोरण विकसित केले जात आहे. हे धोरण आरोग्य सेवेमध्ये सर्वसमावेशक वापरासाठी मार्गदर्शन करेल, असेही डॉ. बर्नवाल म्हणाले.

डॉ. बर्नवाल यांनी योजनेच्या सात वर्षांच्या प्रवासावर, पारदर्शकता आणि परिणामांवर झालेल्या तिच्या प्रभावावर, तसेच डेटा आणि एआय भारताच्या आरोग्य सेवा परिवर्तनाचा पुढील टप्पा कसा निश्चित करू शकतात यावर आपले विचार यावेळी मांडले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शक सूचनांचा संग्रह, एनएचसीएक्स स्ट्रॅटेजी पेपरचे प्रकाशन राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची डिजिटल अकॅडमीचा प्रारंभ आणि विविध संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला.

शिबिराच्या पहिल्या दिवशी एबीपीएमजेएवाय व एबीडीएम अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. की-परफॉर्मन्स इंडिकेटर्स (केपीआय), क्लेम्स डेटावर आधारित विश्लेषण, तसेच डिजिटल हेल्थ सुविधांची सादरीकरणे यामध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्रासह झारखंड, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांकडून त्यांच्या डिजिटल हेल्थ मिशनच्या अनुभवांवर सादरीकरण करण्यात येणार आहे.

दुसऱ्या दिवशी आयटी अपडेट्स, एनएचसीएक्स सक्षम एचएमआयएस प्रणालीचे प्रात्यक्षिक, हेल्थ डेटा अॅनालिटिक्स युनिटचे निष्कर्ष सादर केले जाणार आहेत. यासोबतच एम्सद्वारे विकसित क्लिनिकल डिसिजन सपोर्ट सिस्टीमच्या अंमलबजावणीवर विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच पीएमजेएवाय आयटी प्लॅटफॉर्मवरील विविध योजनांचे एकत्रीकरण, पीएम-राहत उपक्रम आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एबीडीएमची अंमलबजावणी यावरही सविस्तर चर्चा होणार आहे. शिबिराच्या समारोप सत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्ये व रुग्णालयांना एबीडीएम व पीएमजेएवाय पुरस्कार व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande