
पुणे, 19 एप्रिल (हिं.स.)। समता,बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांची जागर करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताह व विचार प्रबोधन पर्व २०२६ चा समारोप सुरेल संगीत,मधुर स्वर आणि भीम गीतांच्या संगमात उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
या पर्वाच्या समारोप प्रसंगी प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी यांनी स्वरांच्या नादमधुर लहरींनी वातावरण भारावून टाकत,भीम गीतांच्या सादरीकरणातून समतेचा संदेश देत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
या विचार प्रबोधन पर्वामध्ये सप्ताहभर विविध प्रबोधनात्मक,सांस्कृतिक,सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जागरूकता निर्माण करण्यात आली. तर या सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी प्रसिद्ध गायकांचे गीत गायन ठेवण्यात आले होते.समारोपाच्या दिवशी आयोजित गीत गायन कार्यक्रमाला विशेष प्रतिसाद मिळाला. अभिजित कोसंबी यांच्यासह मेघानंद जाधव आणि मधुकर कदम यांनीही आपल्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या गायनातून सामाजिक समतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.या संपूर्ण उपक्रमाद्वारे समाजात समता,बंधुता आणि एकात्मतेची मूल्ये अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु