
तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि नाफेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी
नाशिक, 02 एप्रिल (हिं.स.)।
:नाशिक जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून तब्बल १२00 ते १५00 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप तक्रारदार गोरख संत यांनी केला आहे. 'भोंदू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याने बोगस कंपन्यांच्या जाळ्याद्वारे शासन आणि हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे संत यांनी म्हटले असून, या प्रकरणात तत्कालीन कृषिमंत्री आणि नाफेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.भोंदू अशोक खरात आणि त्याची पत्नी संचालक असलेल्या श्री व्यंकेश्वर या कंपनीसह अजुन 12 ते 15 बोगस कंपनीच्या माध्यमातून खरातने शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केली असल्याचा खळबळजनक दावा गोरख संत यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड नजीक असलेल्या व येवला तालुक्यातील कातरणी येथील रहिवासी आणि नाफेड घोटाळा उघडकीस आणणारे गोरख संत यांनी पत्रकार परिषदेत खरात याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. खरात याच्या मालकीची 'श्री व्यंकटेश्वर फार्म प्रोड्युसर कंपनी' आणि त्यासोबतच इतर १२ ते १५ बोगस कंपन्यांच्या माध्यमातून हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. नाफेडच्या खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फेरफार करून कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारण्यात आल्याचे संत यांचे म्हणणे आहे.एखाद्या कंपनीला 3 वर्षाचे वर ऑडिट असले तरच खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात येते मात्र भोंदू खरातची कंपनी ही 2022 साली रजिस्टर झाली मग ईला खरेदी करण्यासाठी परवानगी दिली कोणी यात केंद्रातील व राज्यातील अनेक राजकीय नेते व नाफेडचे अधिकारी देखील सामील असल्याने त्यांची सखोल चौकशी करावी यातून बराच मोठा घोटाळा बाहेर येईल असे मत गोरख संत यांनी व्यक्त केले.
तत्कालीन कृषिमंत्री वादाच्या भोऱ्यात?
या घोटाळ्याचे धागेदोरे राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचल्याचा आरोप करत संत यांनी तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक खरात आणि कोकाटे हे दोघेही सिन्नर तालुक्यातील असल्याने त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याचा दावा संत यांनी केला. खरात आणि तत्कालीन कृषिमंत्र्यांचे १०० टक्के संबंध असून त्यांच्या पाठबळाशिवाय एवढा मोठा घोटाळा होणे शक्य नाही, असे सांगत त्यांनी मंत्री, नाफेडचे संचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
नाशिक जिल्हा हा कांदा आणि इतर शेतमालासाठी नाफेडच्या खरेदीवर अवलंबून असतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या नावाने एवढा मोठा डल्ला मारला गेल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी प्रशासन आणि पोलीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV