
नाशिक, 02 एप्रिल (हिं.स.)।
शहरात गुरुवारी सायंकाळी अल्पावधीतच झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांची गैरसोय झाली. सराफ बाजार, मेन रोड आणि दहिपुल परिसरात गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिवसभर कडक ऊन व ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू असताना दुपारी अचानक हवामान बदलले आणि जोरदार सरी कोसळल्या.
शालिमार, सीबीएस, पंचवटी, सातपूर, सिडको, अंबड आणि नाशिकरोड भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. मात्र, या पावसामुळे तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाची नोंद झाली असून कांदा व गहू पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाच्या या अंदाजामुळे शेतकरी चिंतेत असून विशेषतः कांदा व गहू पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. वादळी वाऱ्यासह होणारा पाऊस फळबागांसाठीही धोकादायक ठरू शकतो
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV