
मुंबई, 02 एप्रिल (हिं.स.) - आगामी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडी सुरू आहेत. 13 मे रोजी विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपत असून, या रिक्त होणाऱ्या जागांसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे. कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये रणजीतसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर या आमदारांचा यात समावेश आहे. यापैकी कोणाला पुन्हा संधी मिळते की पक्षाकडून नवीन चेहऱ्यांना वाव दिला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीत सिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता, भाजपचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, पक्षाकडे इच्छुकांची यादी खूप मोठी आहे. विशेषतः ज्या नेत्यांना नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संधी मिळाली नाही, त्यांनी आता विधान परिषदेसाठी बाशिंग बांधून तयार आहेत.
दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.
विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या नऊ सदस्यांमध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केणेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शप), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस), राजेश राठोड यांचा समावेश आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही कार्यकाळ 13 मे रोजी संपत आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागा येणार असल्याने, ती जागा उद्धव ठाकरेंसाठी सोडली जाणार का? ठाकरे गटाचे 20 आमदार असल्याने त्यांचा या जागेवर दावा आहे, मात्र काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काय भूमिका घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी