रेल्वे - महामार्ग केवळ वाहतुकीची साधने नाहीत; तर ती राष्ट्रीय एकात्मतेची साधने - राष्ट्रपती
नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.)। पायाभूत सुविधा हा तो पाया आहे ज्यावर आधुनिक राष्ट्रे उभी राहतात. रेल्वे आणि महामार्ग केवळ वाहतुकीची साधने नाहीत; तर ती आर्थिक विस्तार, सामाजिक समावेशकता आणि राष्ट्रीय एकात्मतेची साधने आहेत. जेव्हा एखादी रेल्वे दुर्गम
Probationary Officers Indian Railways Central Engineering Service (Roads) Rashtrapati Bhavan


नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.)। पायाभूत सुविधा हा तो पाया आहे ज्यावर आधुनिक राष्ट्रे उभी राहतात. रेल्वे आणि महामार्ग केवळ वाहतुकीची साधने नाहीत; तर ती आर्थिक विस्तार, सामाजिक समावेशकता आणि राष्ट्रीय एकात्मतेची साधने आहेत. जेव्हा एखादी रेल्वे दुर्गम गावात पोहोचते किंवा एखादा महामार्ग दूरच्या प्रदेशाला जोडतो, तेव्हा अशा प्रदेशांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी प्रचंड संधी खुल्या होतात. असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.

भारतीय रेल्वेचे परिविक्षाधीन अधिकारी (2022 आणि 2023च्या तुकडीतील) आणि केंद्रीय अभियांत्रिकी सेवेचे (रस्ते) सहायक कार्यकारी अभियंते (2021, 2022, 2023 आणि 2024च्या तुकडीतील) यांनी 20, एप्रिल 2026 रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

या वेळी अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताच्या विकासाच्या प्रवासातील एका निर्णायक क्षणी ते लोकसेवेत दाखल झाले आहेत. 'विकसित भारत' घडवण्याच्या सामूहिक निर्धाराने देश पुढे वाटचाल करत आहे. भारतीय रेल्वे आणि केंद्रीय अभियांत्रिकी सेवेचे (रस्ते) युवा अधिकारी म्हणून, ते अशा भूमिकांमध्ये पाऊल ठेवत आहेत, ज्यांचा थेट परिणाम लाखो नागरिकांच्या जीवनावर होतो. त्यांच्या निर्णयांचा आणि कृतींचा नागरिकांच्या जीवनमानावर थेट आणि दूरगामी परिणाम होईल यावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, मजबूत पायाभूत सुविधांमुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो, व्यापाराला चालना मिळते, गुंतवणूक आकर्षित होते आणि उत्पादकता वाढते. यामुळे प्रदेश आणि लोक जवळ येऊन राष्ट्रीय ऐक्य मजबूत होते. केवळ आकडेवारीने यश ठरत नाही हे लक्षात ठेवा. त्यांच्या कामाचे खरे मोजमाप हे लोकांचे जीवनमान कसे सुधारते यावर अवलंबून आहे, असा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

राष्ट्रपतींनी अधिकाऱ्यांना सचोटी, उत्तरदायित्व आणि उत्कृष्टतेप्रती वचनबद्धता यांसारखी लोकसेवेची मूल्ये जपण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, आव्हाने आणि कठोर निर्णयांचे क्षण येतील. अशा क्षणी, त्यांच्या मूल्यांनी त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. नेहमी जिज्ञासू राहण्याचा, सतत शिकत राहण्याचा आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्या म्हणाल्या की, ते जे निर्णय घेतील जे मापदंड ठरवतील आणि जी निष्ठा दाखवतील, त्याचा दीर्घकाळ प्रभाव पडेल. ते केवळ प्रशासक नाहीत, तर प्रगतीचे प्रवर्तक आणि जनतेच्या विश्वासाचे रक्षक आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande