
रत्नागिरी, 20 एप्रिल, (हिं. स.) : “लाभार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावता, आपल्या कौशल्याच्या आधारे स्वतःचा व्यवसाय उभा करून इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात,” असे आवाहन माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी येथे केले.
जनशिक्षण संस्थानतर्फे वर्ष २०२५-२६ चा प्रमाणपत्र वितरण सोहळा मराठा भवन येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे पाहुणे तसेच उपाध्यक्ष सौ. अदिती सावंत आदी उपस्थित होते. याशिवाय उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. जानकी घाटविलकर, डीआरडीएचे प्रवीण पावसकर, नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, महिला व बालकल्याण सभापती सौ. प्रीती सुर्वे, नगरसेविका सौ. वर्षा ढेकणे, सौरभ मलुष्टे उपस्थित होते.
उपाध्यक्ष सौ. अदिती सावंत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संचालिका सौ. निधी सावंत यांनी सांगितले की, माजी मंत्री सुरेश प्रभू व सौ. उमा प्रभू यांच्या मानव साधन विकास संस्थेअंतर्गत तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय पुरस्कृत जन शिक्षण संस्थानतर्फे २०२१ पासून जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे रोजगार निर्मितीसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे कार्य सुरू आहे. यापुढेही अशाच प्रकारचे कार्य चालू राहणार आहे.
सूत्रसंचालन सौ. सोनाली सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचारी संतोष घडशी, साहिल शेट्ये, निशा उपलप, अमृता शेट्ये व सानवी कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हाभरातील विविध उपकेंद्रांमधील प्रशिक्षक व लाभार्थी या वेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी